कोल्हापूर : ३१ डिसेंबर… मावळत्या वर्षाला निरोप देताना मद्याच्या बाटल्या रित्या केल्या जात असताना कोल्हापूरकर मात्र दुग्धपान करण्यात मग्न राहिले. दारूच्या आहारी न जाता सदृढ शरीरासाठी दुग्ध प्राशन उपयुक्त आहे, असा संदेश या निमित्ताने कोल्हापूरच्या तरुणाईने घालून दिला. वर्षाचे स्वागत करीत असताना साधारण तरुणाई व्यसनांच्या अधीन जात असते. ३१ डिसेंबर रोजी अनेक तरुण आपल्या आयुष्यात व्यसन करतात. एका समाज शास्त्रीय अभ्यासानुसार दारूच्या पहिल्या थेंबाला स्पर्श करणाऱ्यांपैकी साधारण १५ ते १८ टक्के लोक पुढे अट्टल व्यसनी होतात,असे निरीक्षण आहे . अर्थात अशा अट्टल व्यसनी लोकांचा विवेक नाहीसा होतो. आणखी वाचा-थुंकीमुक्त शहर नववर्षाचा संकल्प; कोल्हापूरकर उतरले रस्त्यावर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तरुणाई व्यसनांकडे वळण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांच्या महाविद्यालयीन काळात व्यसनमुक्ती संकल्प अभियान चालवते. व्यसन हा एक मानसिक आजार आहे. योग्य उपचारांनी तो आजार बरा करता येतो. दुसरीकडे स्वतःला उच्चशिक्षित आणि उच्चवर्गीय मानणाऱ्या समुदायात व्यसनांना प्रतिष्ठा मिळत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस व्यसनी माणसांचा उपहास किंवा त्यांची बदनामी न करता "चला, व्यसनांना बदनाम करूया" उपक्रमांतर्गत व्यसनाचे प्रतीक म्हणून दारूच्या बाटलीला जोडे मारण्याचा उपक्रम घेतला. यावेळी "द दारूचा नाही; तर द दुधाचा" असा संदेश देत महाविद्यालयीन तरुणाईला दूध वाटप केले. या उपक्रमासाठी लागणारे दूध कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) पुरवले गेले. आणखी वाचा-सर्व मंत्र्यासमोर १ जानेवारीपासून इचलकरंजीत निदर्शने; पाणी प्रश्न तापला यावर्षी या उपक्रमांतर्गत न्यू कॉलेज कोल्हापूर, डी आर माने कॉलेज कागल, सदाशिवराव मंडलिक कॉलेज, मुरगूड सामाजिक न्याय विभागाचे गुणवंत विद्यार्थी वसतिगृह दसरा चौक, कोल्हापूर आणि कंदलगाव आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने सिनर्जी इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव येथे हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांना न्यू कॉलेज चे प्राचार्य डॉ व्ही एम पाटील, डॉ आर. डी.ढमकले , प्रा डॉ चैत्रा राजाज्ञा, प्राचार्य डॉ प्रवीण चौगले, प्रा. डॉ. लखन भोगम, प्रा डॉ संतोष जेठीथोर, टी. एस. गडकरी, डॉ फराकटे, संदीप जंगम, ऋषीकेश भोजे हे उपस्थित होते. या उपक्रमासाठी जिल्हा कार्याध्यक्ष रेश्मा खाडे, प्रधान सचिव हरी आवळे, राज्य कार्यवाह रामदास देसाई, अंशुमन सुळगावकर, मोहित पोवार, शामल दीपा, संघसेन जगतकर, कपिल मुळे, सचिन सुतार, सारिका पाटील, भीमराव कांबळे, आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.