मुसळधार पावसामुळे कोल्हापूर शहराला अवघ्या काही तासांमध्ये तलावाचं रुप प्राप्त झालेलं आहे. कोल्हापूर शहरात सोमवारी पहाटेपासूनच पावसाने कहर केला. या पावसामुळे शहरातल्या महत्वाच्या रस्त्यांवर पाणी साचलेलं पहायला मिळालं. मात्र या सर्व प्रकारात कोल्हापूर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला. अनेक रहदारीचे रस्ते, शाळा, मैदानं, नागरी वसाहतीत पाणी साचल्यामुळे कोल्हापूरकरांना याचा त्रास सहन करावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
नागरी वस्तीत साचलेल्या पाण्यामुळे गाडी चालकांना वाहन चालवणं जिकरीचं होऊन बसलं होतं

 

सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातला महत्वाचा पूल म्हणून ओळखल्या जाणार्‍या परीख पूलाची अवस्था नदीवरच्या पूलासारखी झाली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांना इथून मार्ग काढणे हे जीवघेणे संकट ठरत आहे. त्याचप्रमाणे दसरा चौक, एम्पॉयर टॉवर परिसरात आय.आर.बी. ने अर्धवट सोडलेल्या कामांमुळे आणि वारंवार कळवूनही महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावरचे पाणी इमारतीच्या तळघरामध्ये साचले . या पाण्यावर डेंग्यूच्या डासांच्या प्रजाती तयार होवून डेंग्यूची लागण होण्याची भिती इथल्या रहिवाशांमध्ये पसरली आहे. राजारामपुरी , शाहूपुरी अशा मध्यवर्ती ठिकाणीही तीन ते चार फूट पाणी वाहत होते . यातून वाहन चालवणंही कोल्हापूरकरांसाठी जिकरीचं होऊन बसलं होतं.

शहरात आज झालेल्या पावसामुळे महापालिकेने नालेसफाई व्यवस्थित झाल्याचा केलेला दावा पुरता पाण्यात वाहून गेला आहे. महापालिकेचे अधिकारी प्रत्येक वेळेला फक्त पोकळ दावे करतात, मात्र प्रत्यक्षात काम होत नसल्याचं सांगत नागिरकांनी अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर शहर तुंबण्यास महापालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी केला . नालेसफाई करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली .

लोकसत्ताच्या कोल्हापूर कार्यालयाबाहेर पावसाने साचलेलं तळं
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain lashed out kolhapur city water logging problem in key ares of city
First published on: 16-07-2018 at 20:31 IST