कोल्हापूर : प्रसंगी मंत्र्यांना कोल्हापुरात फिरकू दिले जाणार नाही, असा इशारा देऊन २४ तास उलटण्याच्या आत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रेल्वे स्थानकात रोखले. अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांची तारांबळ उडाली. तर आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समाजाच्या आरक्षणावरून कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्र्यांना शहर बंदी करण्याचा इशारा काल देण्यात आला होता. आज सकाळी लगेचच त्याची प्रचिती आली. मुंबईवरून पालकमंत्री मुश्रीफ परत आल्यानंतर सकल मराठा समाजाने त्यांना रेल्वे स्थानकावरच अडवले. दिल्लीतील बड्या साहेबांना मराठा समाजाबद्दल राग असल्याने अद्याप निर्णय घेत नसल्याचा आरोप सकल मराठा समाजाने यावेळी केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली.
मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवसांचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला होता. शासनाने तो पाळला नाही. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात हिंमत असेल, तर राज्य सरकारसोबत ताबडतोब चर्चा करावी, असे आव्हान आंदोलकांनी दिले. त्यांना यापुढे शहरबंदी असेल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. मराठा समाज आक्रमक होताच पोलिसांनी आदोलकांना ताब्यात घेतले.