कोल्हापूर : राधानगरी जंगलात आकाशी निळ्याशार कारवी फुलांचा बहर आला आहे. ही फुले सात वर्षांतून एकदाच बहरतात. याचा बहर दीड-दोन महिने असतो. सध्या या कारवीमुळे येथील डोंगर निळ्या-जांभळ्या रंगात बुडून गेले आहेत.

डोंगर उतारावर वाढणारी ही झुडूपवजा वनस्पती म्हणजे सह्याद्रीला लाभलेले एक अमूल्य वरदान म्हटले जाते. पश्चिम घाटातील निसर्गाचा अद्भुत नजराणा असलेली कारवी वनस्पती सात वर्षांनंतर या वर्षी राधानगरीच्या जंगलात फुलायला सुरुवात झाली आहे. कारवी ही वेगवेगळ्या प्रकारात आढळून येते. डोंगर उतारावरील या कारवीला निळ्या आकाशी रंगाची फुले उमलली आहेत. यामुळे राधानगरीचे डोंगर निळ्या नवलाईने फुलून गेले आहे. या कारवीला फुले येऊन गेल्यानंतर गोंडे फुटून फटाक्यासारखे आवाज येऊ लागतात. त्यामुळे निसर्गातील नैसर्गिक दिवाळीचा आनंद लुटता येतो.

हेही वाचा – कोल्हापुरात मिरवणुकीत ध्वनी नियमांचे उल्लंघन

या दिवसांत कारवीवर मोठ्या प्रमाणात मधमाश्या, फुलपाखरे जमा होतात. कारवीचा मध हा आयुर्वेदात सर्वोत्तम औषधी मध म्हणून गणला जातो. निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी राधानगरीच्या परिसरात निसर्गप्रेमींची पावले वळत आहेत.

हेही वाचा – कोल्हापुरातील तिन्ही अपक्ष आमदारांनी महायुतीची डोकेदुखी वाढवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राधानगरीमध्ये बहरलेल्या कारवीच्या प्रजातीस सात वर्षांनी बहर येतो. याशिवाय नऊ आणि अकरा वर्षांनी फुलणारी कारवीची प्रजाती आहे. सप्टेंबर महिन्यात कारवीची फुले उमलू लागतात. याचा बहर दीड-दोन महिने असतो. कारवी फुलल्याने राधानगरी, दाजीपूर जंगल भागात निळसर झाक सर्वत्र दिसत आहे. निसर्गाचा निळा आकाशी रंगोत्सव पाहताना निसर्गाची हानी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. – सम्राट केरकर, बायसन नेचर क्लब