कोल्हापूर : फुलेवाडी अग्निशमन केंद्र इमारतीच्या दुर्घटनाप्रकरणी शनिवारी कोल्हापूर महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांना निलंबित करण्यात आले. शहर अभियंता रमेश मस्कर व उप-शहर अभियंता सुरेश पाटील यांना खातेनिहाय चौकशी का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस शनिवारी सायंकाळी महापालिकेच्या वतीने बजावण्यात आली आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महानगरपालिकेत घेतलेल्या बैठकीमध्ये काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज प्रशासकांनी काही अधिकाऱ्यांवर कारवाई केली.शहरातील १०० कोटी निधीमधील व इतर रस्त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता नियंत्रण तपासणी एजन्सी मार्फत तपासणी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत. संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. फुलेवाडी इमारत दुर्घटना प्रकरणीही एजन्सीमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश काढण्यात आले.
काळम्मावाडी येथील पंपिंग मशिनरी वारंवार बंद पडणे व गणेश उत्सवाच्या कालावधीत आठ दिवस पाणी पुरवठा बंद पडल्याने याची सखोल चौकशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंत्यांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणी जल अभियंता हर्षजीत घाटगे व सहा. अभियंता यांत्रिकी जयेश जाधव यांची चौकशी का करण्यात येऊ नये, म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
बैठकीत व्यक्त केला राग
कोल्हापूर महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या निकृष्ट कामावरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी अधिकार्यांची खरडपट्टी केली होती. मक्तेदारांचे खिसे भरण्याचे काम महापालिकेचे अधिकारी करत आहेत का, अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघाडणी करण्यात आली. कोल्हापूर शहरात विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. परंतु रस्त्यासह सर्वच कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची नागरिकातून तक्रार केली जात आहे. आमदार क्षीरसागर यांनीही या मुद्द्यावर गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांचे काम टोचले होते.
पालकमंत्री आबिटकर, आमदार क्षीरसागर , आमदार अमल महाडिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास आदींनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. चर्चेवेळी शहरात होत असल्याने निकृष्ट कामावरून अधिकाऱ्यांना खडसावण्यात आले. उभय मंत्र्यांच्या प्रश्नांना तोंड देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
१३ ऑक्टोबर पर्यंत खराब रस्ते दुरुस्त करता आले नाही तरी किमान पॅचवर्क पूर्ण करावे, पाणीपुरवठा यंत्रणा सुरळीत ठेवावी, केशवराव भोसले नाट्यगराचे उद्घाटन २ एप्रिलला होईल अशा पद्धतीने काम करण्यात यावे, परताळा तसेच सिद्धांत रुग्णालयाचे बेकायदेशीर काम सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जात आहे , अशी विचारणा क्षीरसागर यांनी केली. अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशामध्ये चालढकल केल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यानंतर आता वरील प्रमाणे कारवाई आयुक्त तथा प्रशासक के. मंजू लक्ष्मी यांनी केले आहे.
