कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघात अगोदर जाहीर केलेली उमेदवारी विजयाचा विश्वास ठेवून बदलली गेली. मात्र, नव्याने जाहीर झालेल्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अचानक माघार घेतल्याने सध्या कोल्हापुरात काँग्रेसला प्रचारापेक्षा प्रतिमेचे झालेले नुकसान भरून काढण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागत आहे. या माघारीमागे पक्षांतर्गत राजकारण की कौटुंबिक प्रश्न याबाबतची शोधयात्रा सध्या करवीरनगरीत जोरात सुरू झाली आहे. उमेदवारीचा घोळ, नेत्यांमधील जाहीर कलह, पदाधिकाऱ्यांमधील नाराजी या साऱ्यांमुळे राजेश लाटकर यांना जरी पाठिंबा जाहीर केला असला, तरी आता हा प्रचार जोर पकडेल का, हा प्रश्न तयार झाला आहे.

‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी सुरुवातीपासून रस्सीखेच सुरू होती. अखेरच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा रंगली होती. कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाणार असे संकेत नेत्यांनी दिल्याने त्यांचा हुरूप वाढला होता. महापालिकेच्या कामकाजात कारभारी म्हणून ओळखले जाणारे शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, राजेश लाटकर यांच्याबरोबरच मराठा महासंघाचे वसंतराव मुलीक ही नावे चर्चेत होती. यांपैकीच लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाली खरी, पण महापालिका अंतर्गत नगरसेवकांच्या राजकारणाचा फटका बसून त्यांची उमेदवारी कापली गेली.

हेही वाचा >>>राहुल यांच्या ‘गॅरंटी’आधी महायुतीची ‘दशसूत्री’, कोल्हापूरच्या सभेत आश्वासनांचा पाऊस; मविआची आज मुंबईत सभा

काही नगरसेवकांनी राजवाड्यात जाऊन मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी उमेदवारी घ्यावी, असा आग्रह धरला. काही नगरसेवक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे दमदार उमेदवार देण्यासाठी दबाव वाढवत राहिले. परिणामी रातोरात उमेदवारी बदलली गेली. कार्यकर्त्यांना उमेदवारी या सूत्रामुळे संयम राखून असलेल्या आमदार जयश्री जाधव यांनी छत्रपती घराण्यामध्ये उमेदवारी गेल्यावर काँग्रेसला रामराम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून आक्रमक पवित्रा दाखवून दिला. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. त्यातून काँग्रेस सावरते न सावरते तोच मधुरिमाराजे यांनी अवघी काही मिनिटे उरले असताना उमेदवारी अर्ज मागे घेतला.

छत्रपती घराण्यात उमेदवारी असल्याने विजयाची समीकरणे काँग्रेसकडून मांडली जात होती. भरवशाचा मोहरा अचानक गायब झाल्याने काँग्रेस कार्यकर्ते सैरभर झाले. जिल्ह्यात काँग्रेसच्या अधिकाधिक जागा जिंकून शासन आल्यानंतर चांगले खाते मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सतेज पाटील यांच्या दृष्टीने तर हा राजकीय धरणीकंप ठरला. त्यांचा पारा इतका चढला, की खासदार शाहू महाराज, छत्रपती घराणेसमर्थक यांना त्यांनी अद्वातद्वा बोलून घेतले. त्यातून शाहू महाराज – आमदार पाटील यांच्यात बिनसल्याच्या चर्चेने जोर धरला. त्यावर या दोघांनीही माध्यमांशी बोलताना आमच्यात कसलाही वाद नसल्याचे सांगत पडदा टाकला खरा; तरीही प्रश्न उभा राहिला तो अचानक अर्ज मागे का घेतला याचा. त्याच्या अनेक कारणांचे पदर चर्चेतून समोर येत गेले.

हेही वाचा >>>Kolhapur North Vidhan Sabha Constituency : शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभेपाठोपाठ विधानसभाही छत्रपती घराण्यात गेल्याने काही नगरसेवकांमध्ये नाराजी होती. लाटकर यांची समजूत काढण्यासाठी शाहू महाराज, मालोजीराजे घरी गेले होते. अनेक मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. तरीही प्रतिसाद नसल्याने छत्रपती घराणे समर्थकांमध्ये हा संयत शाहू महाराजांचा अधिक्षेप होत असल्याची भावना व्यक्त होऊ लागली. खेरीज, लाटकर यांनी बंडखोरी केल्याने मतांत फूट होऊन निकालाचे समीकरण बदलण्याची चिन्हे होती. त्यामुळे सावध पवित्रा घेत उमेदवारी मागे घेतली गेली. तथापि, सामान्य कार्यकर्त्यासाठी उमेदवारी नाकारली, असे शाहू महाराज म्हणत असले, तरी आधीच लाटकरसारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असताना अर्ज घेतला का, तो शक्तिप्रदर्शन करीत भरला का, अखेरच्या क्षणापर्यंत थांबण्याची वेळ का आली, या प्रश्नांची चर्चा करवीरनगरीत रंगली आहे.