कोल्हापूर : खासदारांचा जनसंपर्क घटला आहे. विकासकामे झाली नाहीत. अशी चर्चा विरोधक जाणीवपूर्वक करीत आहेत. ही विरोधकांची स्टंटबाजी आहे, अशा शब्दात खासदार धैर्यशील माने यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला.२०२९ साली लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील माने यांनी मिळवला होता. त्यानंतर इतक्या कालावधीनंतर आज प्रथमच त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी खासदार धैर्यशील माने यांची जनतेशी नाळ तुटली आहे, अशी चर्चा होत असल्याकडे लक्ष  वेधले. त्यावर ते म्हणाले, हा विरोधकांचा कांगावा आहे. माने घराण्याची समाजाशी कायमची नाळ जुळली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही बारा वेळा निवडणुका लढवल्या. त्यामध्ये लोकसभेच्या दहा निवडणुका लढवून आठ वेळा विजय मिळवला आहे. ही जनतेशी संपर्क असल्याची पोचपावती आहे. मी तर जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, खासदार अशारीतीने वर गेलो आहे ते केवळ जनतेच्या सहकार्यामुळेच. त्यामुळे विरोधकांच्या असल्या टीके कडे लक्ष देण्याची गरज नाही.

हेही वाचा >>>शरद पवार यांनी ‘तेव्हासारखे’ वक्तव्य करावे; निवडणूक आणखी सोपी होईल: संजय मंडलिक

अधिक कामे ,सर्वाधिक निधी

कोल्हापूर जिल्ह्यात खासदार म्हणून सर्वाधिक निधी आणण्यात मला यश आले आहे. आत्तापर्यंत ८२०० कोटी रुपयांची कामे केली आहेत, असा दावा करून धैर्यशील माने म्हणाले, माझ्या लोकसभा मतदारसंघात स्थानिक विकासाची कामे गतीने केली आहेत. याशिवाय, रत्नागिरी- हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग, शाहूवाडी ,शिरोळ येथे एमआयडीसी यासारखी मोठी कामे केली आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात कामे सुरूच आहे.

इचलकरंजीला पाणी हवेच

इचलकरंजी शहराच्या दूधगंगा पाणी योजनेला कागल मधून विरोध होत आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पर्यायी योजना देण्यात येईल असे म्हटले आहे . याबाबत खासदार माने म्हणाले, इचलकरंजी शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यासाठी शास्त्रोक्त पाणी पाहणी होऊनच इचलकरंजीला पाणी योजना मंजूर झाली आहे. इचलकरंजीला पुढील ४० वर्षे पाणी दिल्यानंतरही दूधगंगेमध्ये कायमचे पाणी राहणार आहे. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक विरोध केला जात आहे. उद्या मुख्यमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीत दूधगंगा पाणी योजना झालीच पाहिजे, यासाठी ठामपणे आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.