कोल्हापूर : व्यापक सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने संख्याशास्त्राचा वापर केला जाणे गरजेचे आहे. संशोधकांनी सुविधांनी सुसज्ज ठिकाणी जाण्याऐवजी जिथे समस्या आहेत, अशा ठिकाणी जाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. तिथे समस्या सोडवणुकीच्या अनेक शक्यता सामोऱ्या येतात. लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी संख्याशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत डॉ. अभय बंग यांनी गुरुवारी येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आजपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस प्रारंभ झाला, यावेळी डॉ. बंग बोलत होते. अमेरिकेतील मिसीसिपी स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के उद्घाटन अध्यक्षस्थानी होते.

डॉ. अभय बंग यांचे ‘लोकांसमवेत संशोधन’ या विषयावर प्रबोधक बीजभाषण झाले. आदिवासी समाजाच्या संदर्भात केलेले विविध आरोग्यविषयक प्रयोग व प्रकल्पांमध्ये संख्याशास्त्र कसे उपयुक्त ठरत गेले, याविषयी त्यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, लोकांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, निरीक्षण केले पाहिजे, व्यापक माहिती मिळविण्यासह त्या माहितीचे विश्लेषण केल्याने उपयुक्त संशोधन साकार होते. आज संशोधकाला संशोधन निधी, लोकप्रियता या बाबी मोठ्या प्रमाणात मिळतात, पण या साऱ्या भवतालात लोकांचे काय, हा प्रश्न घेऊन उभा राहणारा खरा संशोधक असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. शिर्के, परिषद समन्वयक डॉ. शशीभूषण महाडिक यांनी मांडणी केली. डॉ. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.