कोल्हापूर: इचलकरंजी शहरासाठी मंजूर सुळकूड पाणी योजनेचे अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व समाज कल्याण मंत्री सुरेश खाडे खाडे यांना रविवारी, सोमवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवण्यात येणार असून त्यांच्यासमोर निदर्शने केली जाणार आहेत. असा निर्णय आज सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

“आम्ही सावित्रीच्या लेकी” या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार महिलांच्या उपोषणाच्या वेळी त्वरीत बैठक लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. तथापि अद्याप कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यापूर्वी चंद्रकांतदादा पाटील यांनी दि. १६ फेब्रुवारी रोजी बैठक लावण्याचे दिलेले आश्वासनही अंमलात आले नाही. दि. ११ सप्टेंबरची बैठक रद्द झाल्यानंतर गेल्या पाच साडेपाच महिन्यांत मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे पाठ फिरवली आहे, अशी भावना शहरातील सर्व नागरिकांमध्ये पसरली आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कोल्हापुरात, हातकणंगले मतदारसंघासाठी लक्ष घातले

शहरास सध्या ८/८ दिवस पाणी मिळत नाही. तरीही सरकार व लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीचे राजकारण करण्यासाठी या प्रश्नाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत, अशी सर्रास चर्चा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रविवार दि. ३ मार्च रोजी व मंत्री सुरेश खाडे यांचा दौरा सोमवार दि. ४ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे कृति समितीने पूर्वीपासून जाहीर केलेल्या “काळे झेंडे” निर्णयानुसार सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी समन्वय समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुरेश खाडे यांच्या दौऱ्याच्या वेळी रविवार दि. ३ मार्च व सोमवार दि. ४ मार्च रोजी कार्यक्रमाचे ठीकाणी व वेळी प्रचंड संख्येने काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरातील सर्व नागरिक व महिला यांनी स्वयंस्फूर्तीने हजारोंच्या संख्येने काळे झेंडे घैऊन या निदर्शनामध्ये सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन कृति समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी वाचा-कोल्हापुरातील २ हजार दिवे बंद; आपचा महापालिकेवर कंदील मोर्चा

इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या समन्वय समितीच्या आज प्रताप होगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मदन कारंडे, शशांक बावचकर, सयाजी चव्हाण, सागर चाळके, पुंडलिकराव जाधव, अभिजित पटवा, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे, विकास चौगुले, राहुल खंजीरे, नितीन जांभळे, प्रताप पाटील, जाविद मोमीन, विजय जगताप, प्रसाद कुलकर्णी, राजू आलासे, रवि जावळे, राहुल सातपुते, रिटा रॉड्रिग्युस, सुनील मेटे, प्रकाश सुतार, बजरंग लोणारी, गणपती शिंदे, सुषमा साळुंखे इ. प्रमुख उपस्थित होते.