कोल्हापूर: अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात लढा उभारण्याचा निर्णय येथे एका बैठकीत घेण्यात आला. याचे पहिले पाऊल म्हणून रविवारी कोल्हापूर – सांगली मार्गावरील कृष्णा नदीवरील अंकली नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
कर्नाटक शासन अलमट्टी धरणाची उंची आणखी ५ मीटरने वाढवणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा महापुराचा धोका वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर येथे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पूरबाधित शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांचा सर्वपक्षीय मेळावा घेण्यात आला.
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार अरुण लाड, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी आमदार उल्हास पाटील, विजय देवणे, बाबासाहेब देवकर यांची भाषणे झाली.
संघटित ताकद दाखवणारअलमट्टीच्या उंचीबाबत महाराष्ट्र शासनाची अधिकृत भूमिका स्पष्ट होत नसल्याने या विरोधात लढा सुरू ठेवून संघटित ताकद दाखवून दिली पाहिजे. केंद्राने आमचीही भूमिका ऐकून घेतली पाहिजे, असा उल्लेख करून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील अलमट्टी धरण उंचीवाढ रद्द संघर्ष समितीतर्फे चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.
पालकमंत्र्यांना आठवण करू
अलमट्टीसंदर्भात न्यायालयात कुठलाही खटला सुरू नाही. यासंदर्भात पालकमंत्र्यांना माहीत नाही. त्यांना या संदर्भात आठवण करून देऊ आणि राज्य सरकार मार्फत न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी प्रयत्न करायला सांगू. आपण आपल्या आणि कर्नाटकने त्यांच्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत, असे खासदार धैर्यशील माने म्हणाले.