कोल्हापूर : मागील हंगामात ज्या कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे, त्यांनी १०० रुपये आणि ३ हजार रूपयांपेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये अतिरिक्त देण्यास जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी संमती दर्शवली. त्यामुळे ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी गुरूवारी ( २३ नोव्हेंबर ) फुटली आहे.

ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरूवार सकाळपासून पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं होतं. हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.

मागील हंगामासाठी ऊसाला प्रति टन ४०० रूपये आणि यावर्षी एकरकमी साडेतीन हजार रुपये उचल मिळावी अशी मागणी स्वाभिनामी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती. याबाबत जिल्हा पातळीवर तीन बैठका झाल्या होत्या. तर बुधवारी ( २२ नोव्हेंबर ) सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊनही तोडगा निघाला नाही.

गुरूवारी राजू शेट्टी यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेमध्ये चर्चा झाली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. यामुळे उद्यापासून गेले तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिवाळीचे भेट मिळाली आहे. तर, साखर कारखानदारांनी समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी, पत्रकारांना धकाबुक्की; राजू शेट्टी यांची दिलगिरी

ऊस आंदोलनामध्ये बाजी मारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जल्लोष करीत असताना काही कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. यावेळी वार्तांकन, चित्रीकरण करणाऱ्या माध्यमकर्मींना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून तेथे राजू शेट्टी धावून आले. त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि पत्रकारांची दिलगिरी व्यक्त केली. “पत्रकारांनी केलेल्या सहकार्यांमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आजच्यासह सर्व आंदोलनाला यश आले,” असं राजू शेट्टींनी सांगितलं.