कोल्हापूर : पाऊसमान वाढले असताना खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटकातील अलमट्टी धरणातील व हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच सांगली महापूर नियंत्रण समितीने बुधवारी वेगवेगळ्या निवेदनाद्वारे केली आहे.
जागतिक बँकेने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर नियंत्रणासाठी मंजूर केलेल्या निधीतून पायाभूत सुविधांची कामे करण्यात यावी. तसेच, यंदा महापुरावर नियंत्रण ठेवण्याकरिता अलमट्टी धरणातील पाणीसाठा १५ ऑगस्टपर्यंत ५१५ मीटरपर्यंत स्थिर ठेवण्याकरिता कर्नाटक शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा. दोन्ही जिल्ह्यांतील महापुराचा प्रश्न गंभीर होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अलमट्टी धरण व हिप्परगी बंधारा येथील जलसाठाच्या देखरेखीसाठी स्वतंत्र समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी कृष्णा महापूर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे करण्यात आली. जूनच्या मध्यास जोरदार पाऊस झाल्यानंतर कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नियमानुसार अलमट्टी धरणात ५१३ मीटर पाणीसाठा अपेक्षित असताना सध्या तेथे ५१५.३६ मीटर पाणीसाठा आहे. हिप्परगी बंधाऱ्यातील पाणीसाठा अधिक आहे. येथील दरवाजे खुले करून पाण्याचा विसर्ग वाढवला पाहिजे, अशी मागणी निवेदनात केली असल्याचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, अजित वझे, प्रभाकर केंगार यांनी दिली.