वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग यांसारख्या अनुभवी खेळाडूंना विश्वचषक संघातून वगळणे ही घोडचूक असल्याचे मत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू अब्दुल कादीर यांनी व्यक्त केले. या दोघांच्या सहभागाने भारतीय संघाला चार नियमित गोलंदाजांसह खेळण्याची मुभा मिळाली असती असे त्यांनी सांगितले.
‘‘आशियाई संघ अशा घोडचुका करतात याचे मला आश्चर्य वाटते. सेहवाग आणि युवराजसारख्या आक्रमक फलंदाजांमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण येते. सेहवागने २०११ विश्वचषकात सलामीच्या लढतीतच शतक झळकावले होते तर युवराजने संपूर्ण स्पर्धेत फलंदाजीसह शानदार गोलंदाजीही केली होती. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याने पटकावला होता. या दोघांसह पीयूष चावला तसेच अमित मिश्रा या फिरकीपटूंचा संघात समावेश करायला हवा होता. कारण प्रतिस्पध्र्यानी भीती बाळगावी असे वेगवान गोलंदाज भारताकडे नाहीत,’’ असे कादीर यांनी सांगितले.
कोणता आशियाई संघ उपांत्य फेरीपर्यंत वाटचाल करेल याबाबत कादीर म्हणाले, ‘‘एकच आशियाई संघ उपांत्य फेरीत स्थान पटकावेल. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ’’