आशियाई खेळांच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा नेमबाजांनी भारतासाठी पदकाची कमाई केली आहे. २५ मी. पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनौबतने सुवर्णपदकाची कमाई केली. पहिल्या फेरीपासून सर्वोत्तम खेळ करत राहीने आपलं अव्वल स्थान कायम राहिलं होतं. मात्र शेवटच्या क्षणांमध्ये थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. अंतिम फेरीआधी दोन्ही खेळाडूंचे गुण समान झाले, त्यामुळे सुवर्णपदकासाठी राही आणि थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये शूटऑफवर निर्णय घेण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्येही दोन्ही खेळाडूंचे ४-४ गुण झाल्यामुळे दुसऱ्यांदा शूटआऊटवर सामना खेळवण्यात आला. या शूटऑफवर राहीने ३-२ ने बाजी मारत सुवर्णपदक आपल्या नावे केलं मात्र याच प्रकारात भारताच्या १६ वर्षीय मनू भाकेरला पदकाच्या शर्यतीमधून बाहेर प़डावं लागलं. पात्रता फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी करत पहिलं स्थान कायम राखलेल्या मनूला अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे भारताला संभावित एका पदकावर पाणी सोडावं लागलं. कुस्तीमध्ये आज भारताला निराशा सहन करावी लागली. भारताचा एकही मल्ल आज पदकाची कमाई करु शकला नाही. मात्र दुसरीकडे वुशू या खेळात भारताला ४ कांस्यपदकं मिळाली. महिलांमध्ये ६० किलो वजनी गटात भारताच्या रोशिबीना देवी आणि ५६ किलो वजनी गटात संतोष कुमार यांनी कांस्यपदकाची कमाई केली. ६५ किलो वजनी गटात नरेंद्र गेरवाललाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. याचसोबत ६० किलो वजनी गटात भारताच्या सूर्या सिंहला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सूर्यालाही कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.