ऑस्ट्रेलियावर ४-० असा निर्विवाद विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी संघाचे कौतुक करताना ‘संघ आणि कर्णधाराने आमचा विश्वास सार्थकी ठरवला’ असे गौरवोद्गार काढले आहेत. पण याच वेळी संघाला वास्तवाची जाणीव करून देत दक्षिण आफ्रिकेचा खडतर दौरा यापुढे असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘भारतीय संघ जिंकल्याचा नक्कीच आनंद आहे. संघावर आमचा नेहमीच विश्वास असतो. काही महान खेळाडूंनी निवृत्ती घेतल्याने संघ सध्या संक्रमण अवस्थेत आहे आणि हे आम्ही चांगलेच जाणून आहोत. पण संघ आणि कर्णधाराने आमचा विश्वास सार्थकी लावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघ दुर्दैवी ठरला होता. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे,’’ असे श्रीनिवासन म्हणाले.