भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा सध्या क्रिकेटपासून काही काळ दूर आहे. २०१९मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तंदुरुस्ती राहावी म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पण प्रसारमाध्यमांमध्ये चालवण्यात आलेल्या बातम्यांमुळे सध्या तो हैराण झाल्याचे दिसत आहे. या बाबत त्याने एक ट्विट करून आपला राग व्यक्त केला आहे.

या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे की प्रसारमाध्यमांनी अशाप्रकारे चुकीच्या बातम्या पसरवणे थांबवा. कोणतीही शहानिशा न करता प्रसारमाध्यमांनी मी बाबा होणार असल्याचे वृत्त दिले आहे. पण या वृत्तात कोणतेही तथ्य नाही, असे त्याने म्हटले आहे.

एका वृत्तपत्राचे नाव ट्विटमध्ये मेन्शन करून त्याने असे म्हटले आहे की मी बाबा होणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये दिसून येत आहे. कृपा करून कोणतीही खात्री केल्याशिवाय केवळ बातमी बनवण्यासाठी अशा बातम्या देऊ नका. मी प्रत्येकाला विनंती करतो की कोणीही अशा चुकीच्या बातम्या पसरवू नका.