अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवत आपली घौडदौड कायम राखली. २२५ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानने अखेरच्या षटकापर्यंत भारताला झुंजवलं. भारताकडून मोहम्मद शमीने अखेरच्या षटकात हॅटट्रीक नोंदवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अखरेच्या षटकांमध्ये धोनीने दिलेल्या सल्ल्यामुळे आपण ही कामगिरी करु शकलो असं मोहम्मद शमीने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

जसप्रीत बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत शमीला अखेरच्या षटकात १६ धावा वाचवण्याचं लक्ष दिलं. पहिल्याच चेंडूवर मोहम्मद नबीने चौकार खेचत शमीवर दबाव टाकला. यानंतर धोनीने तात्काळ शमीपाशी जात त्याला काही टिप्स दिल्या. यानंतर शमीने आपल्या गोलंदाजीत तात्काळ बदल, तिसऱ्या-चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर बळी घेत हॅटट्रीक केली.

“यॉर्कर चेंडू टाकायचे ही रणनिती मी ठरवली होती, धोनीनेही मला हाच सल्ला दिला होता. तो मला म्हणाला, “आता काहीही बदलायचा विचार करु नकोस, तुला या षटकात हॅटट्रीक मिळण्याची संधी आहे. अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही, त्यामुळे ठरवल्याप्रमाणे चेंडू टाक.” यानंतर मी ठरवल्याप्रमाणे गोलंदाजी केली ज्याचा मला फायदा झाला. शमी सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलत होता.

दरम्यान, २०१९ विश्वचषक स्पर्धेत हॅटट्रीक नोंदवणारा शमी पहिला गोलंदाज ठरला आहे. तर विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा शमी दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी १९८७ साली चेतन शर्मा यांनी न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात अशी कामगिरी केली होती.