संतोष सावंत

त्या दिवशीचे युद्ध तर त्यांच्या देशाने जिंकले, परंतु या योद्धय़ाची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. त्यांची युद्धनीती सपशेल चुकली आणि हे आपल्या पराभवाचे कारण ठरू शकले असते, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले.

काळोखाने आकाश जणू गिळून टाकले होते. वातावरणात कमालीचा गारवा होता. सर्वदूर शांतता पसरली होती, परंतु योद्धा सेनानी महेंद्रसिंह यांच्या मनात विचारांचे काहूर उठले होते. दुसऱ्या दिवसाची युद्धनीती निश्चित करून ते विश्रांती घेण्यासाठी आपल्या राहुटीत परतले. मंचकावर पहुडले असले तरी आज त्यांना नेहमीप्रमाणे पडल्या पडल्या शांत झोप लागली नव्हती. झरोक्यातून आत येणाऱ्या प्रकाशाच्या अंधूकशा कवडशाकडे ते किती वेळ पाहात होते कोण जाणे. गेली कित्येक वर्षे आपल्या अतुलनीय शौर्याचे प्रदर्शन घडवत त्यांनी अनेक युद्धे जिंकून दिली होती. जगभरात आपला आणि आपल्या देशाचा नावलौकिक निर्माण केला होता. त्यांचे अजोड युद्धकौशल्य आणि अचूक निर्णयक्षमता यांचे दाखले सर्वत्र दिले जात होते. महान सेनानी असाच त्यांचा दबदबा होता. त्यांची युद्धभूमीवरील केवळ उपस्थिती ही विजयाची खात्री मानली जात असे. अशा या महान लढवय्याला आज दुखवण्यात आले होते.

ते लढत असलेले युद्ध निर्णायक वर्चस्वासाठी सुरू होते. अजूनही दीर्घ काळ ते चालणार होते. त्या दिवशीचे युद्ध तर त्यांच्या देशाने जिंकले, परंतु या योद्धय़ाची कामगिरी त्याच्या लौकिकाला साजेशी झाली नाही. त्यांची युद्धनीती सपशेल चुकली आणि हे आपल्या पराभवाचे कारण ठरू शकले असते, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. तसे पाहिले तर आजवर त्यांनी किती तरी वेळा अशा आरोपांचा सामना केला होता. परिस्थितीशी झगडून पुन्हा आपला पराक्रम सिद्ध केला होता आणि म्हणूनच याही आरोपांबाबत त्यांची तक्रार नव्हती. आरोप करणाऱ्यांवर रोष नव्हता. मात्र कुठे तरी आपण माणूस असल्याचेच नाकारले जाते आहे, याचे शल्य त्यांना अधिक बोचत होते. विचार करताना डोळ्यांत अश्रूंनी कधी दाटी केली, हे त्यांना कळलेच नाही. त्यांनी थकून डोळे मिटले आणि त्यांचा भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.   एका लहानशा गावात जन्मलेल्या महेंद्रला लहानपणापासूनच युद्धकलेचे आकर्षण होते. आपण युद्धकलेत पारंगत व्हावे आणि योद्धा म्हणून आपल्याला अवघ्या जगाने ओळखावे असे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. सामान्य घरातील, राजघराण्याचा वारसा किंवा कोणतेही पाठबळ न लाभलेल्या महेंद्रने एकलव्याप्रमाणे युद्धकलेचा अभ्यास सुरू केला. अथक प्रयत्न आणि सातत्य यामुळे त्याचा आत्मविश्वास पहाडाप्रमाणे खंबीर होत गेला आणि एक दिवस त्याला आपले स्वप्न साकार करण्याची संधी लाभली. त्याच्या गावात सैन्यभरतीसाठी दवंडी पिटण्यात आली. तरुण महेंद्रने आनंदाने आपले नाव त्यासाठी नोंदवले. निवड झाली आणि आपल्या अंगभूत गुणाच्या आधारे एक सामान्य सैनिक ते असामान्य सेनानी हा पल्ला त्याने अल्पावधीतच पार केला. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्यक्षमतेबद्दलच शंका उपस्थित करण्यात आली होती. एका चुकीमुळे व्यक्तीचे आभाळाएवढे कर्तृत्व शून्य ठरते. केवळ उगवत्या सूर्यालाच नमस्कार केला जातो. या विचाराने त्यांचे मन विदीर्ण होत होते.

परंतु ही निराशा काही क्षणच टिकली. या वीराने आपल्या तेजस्वी भूतकाळातील अविस्मरणीय घटना मन:चक्षूसमोर आणल्या आणि त्यांच्या मनातील नैराश्य कुठल्या कुठे पळाले. महेंद्रसिंह मंचकावरून खाली उतरले. डोळे मिटून पद्मासनात बसले. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता नाहीशी झाली. श्वास स्थिर झाला. त्यांनी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांत परिस्थितीशी दोन हात करण्याचा दृढनिश्चय स्पष्टपणे दिसत होता. त्यांना जर त्या क्षणी कोणी पाहिले असते तर उद्या ते विजयाचा नवा इतिहास  लिहिणार याची खात्रीच त्याला पटली असती.