Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड या दोन संघामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हत्यार टाकून दिली असल्याचे दिसून आले. तसेच गोलंदाजांनीही फारसा प्रभाव पाडला नाही. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणारा हार्दिक पांड्यादेखील निष्प्रभ ठरत आहे. यासंदर्भात माजी फिरकीपटू हरभजन हरभजन सिंग याने हार्दिक पांड्यावर सडकून टीका केली आहे.

हार्दिक चांगला खेळाडू आहे. पण कसोटी मालिकेत त्याची कामगिरी चांगली होऊ शकलेली नाही. त्याला भरपूर धावा काढणेही शक्य झालेले नाही, तसेच गोलंदाजीतही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. कर्णधारदेखील त्याच्याकडून फारशी गोलंदाजी करून घेताना दिसलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणणे मला पटत नाही, अशी टीका हरभजनने केली आहे.

हार्दिकला जर या हवामानामध्ये गोलंदाजी करता येत नसेल, तर ही बाब हार्दिकच्या दृष्टिने गंभीर आहे. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे ही बाब भारतीय संघाच्या भविष्याच्या दृष्टीने अधिक चिंतेची आहे.अष्टपैलू खेळाडू हा फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोनही क्षेत्रात चांगली कामगिरी करतो. बेन स्टोक्स, सॅम कुरान, ख्रिस वोक्स हे इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू आहेत. ते तसा खेळ करतात. पण हार्दिकला ते शक्य होत नाही. त्यामुळे हार्दिकला अष्टपैलू म्हणणे बरोबर नाही. कारण एका रात्रीत कोणी कपिल देव बनू शकत नाही’, असेही तो म्हणाला.