काही दिवसांपूर्वीच आपण हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी केली. हा दिवस भारतात क्रीडा दिवस म्हणूनही साजरा केला. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच २ सप्टेंबरला भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांना हॉकी इंडियाने आपल्या पदावरुन हटवलं. वास्तविक पहायला गेलं तर या दोन घटनांमध्ये तसा काही संबंध आढळून येणार नाही, मात्र ओल्टमन्स यांच्या आधीचे प्रशिक्षक पॉल वॅन अॅस यांची प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर त्याच पद्धतीने ओल्टमन्स यांना पदावरुन हटवलं जाणं, ही गोष्ट म्हणजे भारतीय हॉकीचा पाय आणखी खोलात जात असल्याची चिन्हं आहेत.

हॉकी इंडियाच्या High Perdormance and Development Committe ने तब्बल तीन दिवस सल्लामसलत केल्यानंतर ओल्टमन्स यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर आगामी टोकीयो ऑलिम्पीकपर्यंत ओल्टमन्स यांना भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी मुदतवाढ मिळाली होती. मात्र अचानक ओल्टमन्स यांना पायउतार व्हायला का बरं भाग पाडलं गेलं असेल??? हॉकी इंडियातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ओल्टमन्स यांच्या विरोधात गेलेले मुद्दे कोणते आहेत, हे जाणून घेऊयात –

१) भारताच्या कामगिरीत सातत्य नाही, वास्तविक पाहता ओल्टमन्स यांच्यात कारकिर्दीत भारताने ११ व्या स्थानावरुन सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र महत्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघ कच खातो.

२) मलेशियासारख्या संघाविरोधात या वर्षी भारतीय संघाला दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला. ( एकदा सुलतान अझलन शहा कप स्पर्धेत, दुसऱ्यांदा वर्ल्ड हॉकीलीग उपांत्य स्पर्धेत ) त्यातल्या त्यात दुबळ्या कॅनडानेही भारतीय संघावर मात केली. या दोन कामगिरी ओल्टमन्स यांच्या विरोधात गेल्या असल्याचं बोललं जातंय.

आपण सर्वांनी कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरीही भारतीय हॉकी ही सध्या गाळात रुतुन बसलेली आहे. तिला ध्यानचंद यांच्या सोनेरी कालखंडाच्या गोड आठवणीतून बाहेर काढत बदललेल्या जगासमवेत आणायचं तर याला नक्कीच वेळ लागणार. यासाठी ओल्टमन्स यांनी आपल्या कारकिर्दीत संघात काही बदल केले होते. भारतीय हॉकीच्या भविष्यासाठी ओल्टमन्स यांनी Long-term Plan ही समितीसमोर सादर केल्याचं समजतंय. मात्र सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हॉकी इंडियाचे High Performance Director डेव्हिड जॉन यांनी, भारतीय हॉकीला दीर्घकालीन नाही तर झटपट निकाल हवे आहेत असं सांगितलं. “हॉकी वर्ल्डलीग, आशियाई खेळ, आशिया चषक यासारख्या स्पर्धा आम्हाला जिंकायच्या आहेत. आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ पहिल्या ३ स्थानांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे. मात्र ओल्टमन्स यांनी तयार केलेल्या आराखड्यात हे निकाल मिळणं शक्य नसल्याचं”, जॉन यांनी म्हणलंय.

मात्र हॉकी इंडियाचा हाच विचार खूप वरवरचा आणि उथळ आहे हे आपल्याला समजून येईल, रोलंट ओल्टमन्स यांनी भारतीय हॉकी संघाला विजयाची सवय लावली. २०१३ साली हॉकी इंडियात High Performance Director म्हणून रुजू झालेल्या ओल्टमन्स यांच्याकडे २०१५ साली भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती आली. मात्र अतिशय अल्प कालावधीत ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत हनुमान उडी घेतली. चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळालेलं रौप्यपदक, महत्वाच्या स्पर्धांमध्ये तुल्यबळ संघांना दिलेली मात, मार्गदर्शक या नात्याने भारताच्या युवा संघाला मिळवून दिलेला हॉकीचा विश्वचषक…ही ओल्टमन्स यांच्या नवीन पद्धतीने भारतीय हॉकीला मिळालेलं फळं आहे.

भारतीय हॉकीला आंतराष्ट्रीय पातळीवर मोठं करायचं असेल तर काही धोरणात्मक बदल हे करावेच लागणार होते. उदाहरणार्थ संघात कामगिरी न करणाऱ्या पण ज्येष्ठत्वामुळे जागा अडवून बसलेल्या खेळाडूंना ओल्टमन्स यांनी पहिल्यांदा बाहेरचा रस्ता दाखवला. व्ही.आर.रघुनाथ हा भारताचा हक्काचा आणि भरवशाचा ड्रॅगफ्लिकर होता, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्याची मैदानातली निराशाजनक कामगिरी पाहता ओल्टमन्स यांनी योग्यवेळीत पावलं उचलत रघुनाथला संघाबाहेर करत हरमनप्रीत सिंह या तरुण खेळाडूला संघात जागा दिली. सरदार सिंह हा भारतीय हॉकीचा कणा मानला जातो. मात्र बदलत्या काळानुरुप संघात बदल घडवण्याच्या दृष्टीकोनातून ओल्टमन्स यांनी सरदार सिंहकडून गोलरक्षक पी.आर.श्रीजेशच्या हाती नेतृत्व सोपवलं. ऑलिम्पिकमध्ये ओल्टमन्स यांच्या प्रयत्नांवर भारतीय खेळाडूंनी आपल्या हाराकिरीने पाणी फिरवलं, मात्र त्यानंतरही हार न मानता ओल्टमन्स संघात नव-नवीन बदल करत राहिले. यानंतर कोणत्याही एका खेळाडूवर कर्णधारपदाचं ओझं येऊ नये म्हणून ओल्टमन्स यांनी संघात रोटेशन पॉलिसी वापरली. युवा खेळाडू मनप्रीत सिंहकडे संघाचं कर्णधारपद सोपवलं. चिंगलीन साना सारख्या तरण्याबांड खेळाडूला संघात उप-कर्णधारपदाची जागा दिली. संघातल्या महत्वाच्या खेळाडूंवरचा दबाव कमी व्हावा यासाठी ओल्टमन्स यांनी ही पॉलिसी वापरली होती, जी हळूहळू मैदानात आपला रंग दाखवत होती. मात्र दुर्दैवाने भारतीय क्रीडा संघटनांचं राजकारण हे, ‘ पी हळद आणि हो गोरी’ या तत्वावर चालत असल्यामुळे ओल्टमन्स यांच्या दूरगामी विचारांमध्ये हॉकी इंडियाच्या अधिकाऱ्यांना कदाचीत रस राहिला नसावा.

कोणताही प्रशिक्षक हा आपल्या संघाला मैदानात चांगला खेळ करण्याच्या युक्त्या शिकवू शकतो. प्रत्यक्ष मैदानात जाऊन चांगला खेळ करण्याचं काम हे खेळाडूंचं आहे. भारतीय संघाची आघाडीची फळी हे गेली अनेक वर्ष डोकेदुखीचं कारण बनलेलं आहे. आपल्याच खेळाडूंमध्ये ताळमेळ नसणं, बॉलवर नियंत्रण सोडून देणं अशा अनेक्ष क्षुल्लक चुकांमुळे संघाला सामने गमवावे लागले आहेत. अझलन शहा आणि वर्ल्ड हॉकीलीग उपांत्य स्पर्धेतील मलेशियाकडून मिळालेली हार आणि कॅनडाविरुद्ध झालेला अपमानास्पद पराभव हे भारताच्या आघाडीच्या फळीतल्या हाराकिरीचं उत्तम उदाहरण आहे. मात्र या स्पर्धेनंतर ओल्टमन्स यांनी कडक पवित्रा घेत संघातील सर्व ज्येष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवत विश्वचषक जिंकणाऱ्या युवा संघातील ६ खेळाडूंना संघात जागा दिली. आणि सुदैवाने भारतीय संघाने युरोप दौऱ्या बेल्जियम संघाविरुद्धची मालिका जिंकून, ऑस्ट्रियावर मात करत ओल्टमन्स यांचा विश्वास सार्थ ठरवला.

एक डावपेच अयशस्वी ठरल्यानंतर ओल्टमन्स आपल्या पोतडीतून नवे डावपेच आणत होते. मात्र अशावेळी त्यांच्यावर विश्वास दाखवायचं सोडून दोन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाचं कारण देत त्यांची हकालपट्टी करणं हा अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे टोकिया ऑलिम्पिकला ३ वर्षांचा कालावधी असताना असा निर्णय घेणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्या पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखं आहे. सुदैवाने ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ उभारी घेत होता. खेळ म्हणला की जय-पराजय हा भाग आलाच. मात्र पराभव पदरी पडल्यावर खचून न जाणं आणि सामना जिंकल्यानंतर त्याचा गर्व न बाळगता लगेच तयारीला लागणं हे ओल्टमन्स यांनी भारतीय संघाला शिकवलं होतं. मात्र इतकी मोलाची शिकवण देणारा प्रशिक्षक अचानक हॉकी इंडियाला नकोसा होतो हे अनाकलनीय आहे.

परदेशी प्रशिक्षक आणि हॉकी इंडिया यांच्यातलं नात काही चांगलं राहिलेलं नाहीये. ओल्टमन्स यांच्याआधी रिक चार्ल्सवर्थ, जोस ब्रासा, मायकल नॉब्ज, टेरी वॉल्श, पॉल वॅन अॅस या परदेशी प्रशिक्षकांना हॉकी इंडियाने मधूनच घरचा रस्ता दाखवलेला आहे. पॉल वॅन अॅस यांना हॉकी इंडियाचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांच्याशी झालेल्या वादामुळे पायउतार व्हावं लागलं होतं. सामना सुरु असताना भारतीय संघाला सल्ला द्यायला आलेल्या नरेंद्र बत्रा यांना तत्कालीन प्रशिक्षक पॉल वॅन अॅस यांनी हटकलं होतं. यावरुन नाराज होत बत्रा यांनीच पॉल वॅन अॅस यांना पदावरुन पायउतार व्हायला भाग पाडलं होतं. त्यामुळे दुर्दैवाने भारतीय संघाची घडी ही कधीही व्यवस्थित बसू शकली नाही. क्रीडा संघटनातील पदाधिकाऱ्यांचा खेळात वाढत जाणारा हस्तक्षेप आणि खेळ वाढावा याऐवजी राजकारण करण्यावर दिला जाणारा भर यामुळे भारतीय खेळाडू आंतराष्ट्रीय पातळीवर चमकत नाहीत. हॉकी संघही याच व्यवस्थेला पडलेला बळी आहे.

ओल्टमन्स यांना पायउतार व्हायला भाग पाडल्यानंतर सध्या नवीन प्रशिक्षक मिळेपर्यंत High Performance Director डेव्हिड जॉन हे संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. मात्र हॉकी इंडियाचा एकंदर इतिहास पाहता डेव्हिड जॉन यांनाच आगामी काळात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची सुत्र सोपवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑलिम्पिक खेळांआधी तयार होत असलेल्या संघाची घडी विस्कटायची ही परंपरा यंदाही कायम राहिलेली आहे. त्यामुळे ओल्टमन्स यांना पायउतार व्हायला भाग पाडत बुडत असलेल्या भारतीय हॉकीला खुद्द हॉकी इंडियानेच खोलात ढकललंय असं म्हणायला हरकत नाही.