विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत २-० असं निर्भेळ यश मिळवलं. कर्णधार विराट कोहलीने कोलकाता कसोटी सामन्यात शतक झळकावलं, याचसोबत भारतीय गोलंदाजांनीही भेदक मारा केला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झालेला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल फलंदाजांच्या क्रमवारीत TOP 10 मध्ये दाखल झाला आहे.

मयांकच्या खात्यात सध्या ७०० गुण आहेत, याआधी मयांक ११ व्या स्थानावर होता. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याचं स्थान वधारलं आहे. याव्यतिरीक्त भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर कायम राहिले आहेत. मात्र असं असलं तरीही विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यातील गुणांचं अंतर आता कमी झालेलं आहे.

२०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळेल. यानंतर २०२० साली भारतीय संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.