भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १९१ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडच्या चिवट अर्धशतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पहिल्या डावात भारताने सर्वबाद २५० धावा केल्या. त्यानंतर उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मैदानावर आले. मात्र भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची धांदल उडाली. अश्विनने सर्वाधिक ३ बळी टिपले. सध्या ट्रेव्हिस हेड ६१ आणि मिचेल स्टार्क ८ धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. इशांत शर्माच्या पहिल्याच षटकात अॅरोन फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. यानंतर हॅरिस आणि ख्वाजा यांनी खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरला. दोघांमध्येही दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी झाली. अखेर रविचंद्रन आश्विनने हॅरिसला माघारी धाडत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने २ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर हॅरिस २६ धावांवर बाद झाला. अनुभवी शॉन मार्शला २ धावांत अश्विनने माघारी धाडले. लगेचच ख्वाजा २८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ११७ अशी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रात पीटर हॅंड्सकोम्ब ३४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कर्णधार टीम पेनदेखील ५ धावा करून माघारी परतला. बुमराहने टाकलेला चेंडू स्टंपच्या रेषेत येणार नाही असा अंदाज करत कमिन्सने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या पायावर आदळला आणि तो पायचीत झाला. या आधी भारताने पहिल्या डावात २५० धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह जोडी भारताच्या धावसंख्येत काही धावांची भर घालेल, अशी आशा होती. मात्र जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीने यष्टीरक्षक टीम पेनकडे झेल दिला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडने ३ तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि नॅथन लॉयन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.