तिसऱ्या कसोटी सामन्याआधी बोटाला झालेल्या दुखापतीमुळे यष्टीरक्षक दिनेश कार्तिकऐवजी युवा ऋषभ पंतला संघात जागा देण्यात आली. आपल्याला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचललेला आहे. फलंदाजीसाठी पहिल्यांदा मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात षटकार ठोकून केली आहे. अशी कामगिरी करणारा ऋषभ पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १२ खेळाडूंनाच अशी कामगिरी करता आलेली आहे. आदिल रशिदच्या गोलंदाजीवर पंतने षटकार ठोकला.

ऋषभ पंत भारताला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा २९१ वा खेळाडू ठरला आहे. दरम्यान पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी आश्वासक फलंदाजी केली आहे. अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस ३०७ धावांपर्यंत मजल मारली आहे.