India vs England 5th test : भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या. भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले. लंडनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कूक आणि जेनिंग्स यांनी इंग्लंडला अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण त्यानंतर पहिल्या सत्रात सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या सत्रात मात्र भारताला एकही गडी बाद करता आला नाही. आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले. तो ७१ धावांवर बाद झाला. लगेचच कर्णधार जो रूट आणि पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर तंबूत परतले. स्टोक्सने (११) काही काळ मोईन अलीला साथ दिली. पण तोदेखील पायचीत झाला. काही वेळाने १६७ चेंडूत अर्धशतकी चिवट खेळी करणारा मोईन अली बाद झाला. सॅम कुर्रानलाही भोपळा फोडता आला नाही. सध्या बटलर ११ तर रशीद ४ धावांवर खेळत आहे. दरम्यान, चौथा सामना जिंकून इंग्लंडने मालिका ३-१ने खिशात घातली आहे. पण आपली विजयी लय कायम राखण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे दीर्घ अशा इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असल्याने दौऱ्याचा शेवट गोड करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण होणार आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे.