भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने, इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटीचा अपवाद वगळता एकाही सामन्यात भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करु शकले नाही. शुक्रवारपासून भारत व इंग्लंड यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs ENG : आता विराट कोहली मोडणार द्रविडचा विक्रम

“इंग्लंडमध्ये फलंदाजी करत असताना संयम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मग तुम्ही फलंदाजी करत असाल किंवा गोलंदाजी. विकेट मिळवण्यासाठी एका टप्प्यावर गोलंदाजी करत राहणं गरजेचं असतं. तसच फलंदाजांनाही चेंडू सोडून देण्याचं कसब आत्मसात करणं गरजेचं आहे. गोलंदाजांनी या मालिकेत चांगली कामगिरी केली, मात्र फलंदाजांनी त्यांना हवीतशी साथ दिली नाही. एक फलंदाज म्हणून आम्ही सर्वजण या मालिकेत अपयशी ठरलो आहोत.” अजिंक्यने प्रांजळपणे कबुली दिली.

अवश्य वाचा – Ind vs Eng : विराट कोहली-रवी शास्त्री जोडीवर भारतीय खेळाडू नाराज? संघातील बदल भोवल्याचं मत

स्वतःच्या फलंदाजीबद्दल विचारलं असता अजिंक्य म्हणाला, ” या मालिकेत मी हवीतशी फलंदाजी केलेली नाही. काही डावांमध्ये मी खेळपट्टीवर जम बसवल्यानंतर चांगले फटके खेळत होतो. मात्र संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावणं ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मालिका आम्ही गमावलेली असली तरीही शेवटच्या कसोटीसाठी आम्ही तितक्याच जोमाने तयारी करणार आहोत.” इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकने पाचव्या कसोटी सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ आपल्या माजी कर्णधारा विजयाने अलविदा करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ शेवटच्या कसोटीत विजय मिळवून आपली पत राखतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Eng : चौथ्या कसोटीतला पराभव आश्विनमुळे – हरभजन सिंह