आशियाई खेळांआधी भारतीय पुरुष हॉकी संघाने घरच्या मैदानावर खेळताना उत्कृष्ठ सराव करुन घेतला आहे. अखेरच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर मात करुन ३ सामन्यांची मालिका निर्विवादपणे आपल्या नावावर केली आहे. आशियाई खेळांआधी जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम १० संघामधल्या एका संघाशी मालिका खेळून ती जिंकण ही आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट असल्याचं, भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्रसिंह यांनी म्हटलं आहे.

रविवारी झालेल्या सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंह (८ वे मिनीट), सुरेंद्र कुमार (१५ वे मिनीट), मनदीप सिंह (४४ वे मिनीट) आणि आकाशदीप सिंह (६० वे मिनीट यांनी गोल झळकावले. संपूर्ण सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू एकाही सत्रात भारतीय संघाला कडवी टक्कर देऊ शकले नाही. न्यूझीलंडचे प्रशिक्षक डॅरेन स्मिथ यांनीही सामन्यानंतर भारतीय संघाच्या खेळीचं कौतुक केलं.