IPL 2019 Final MI vs CSK : शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नईला एका धावेने पराभूत केले आणि IPL विजेतेपदाचा चौकार लगावला. मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूत २ धावा हव्या होत्या. त्यावेळी अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. अटीतटीच्या या लढतीत राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची गोलंदाजीही अत्यंत निर्णायक ठरली.

१५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फाफ डु प्लेसिस याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. पण त्यातच तो यष्टिचीत झाला. षटकात २ चौकार आणि १ षटकार लगावल्यानंतरही त्याने आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काहीही कळण्याआधीच क्विंटन डी कॉक ने त्याला यष्टीचीत करत चेन्नईला पहिला धक्का दिला. डु प्लेसिसने २६ धावा केल्या. संथ खेळी करत खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करताना रैना झेलबाद झाला. त्याने १४ चेंडूत ८ धावा केल्या. आखूड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना रायडू स्वस्तात झेलबाद झाला. त्याने केवळ १ धाव काढली.

त्यानंतर धोनी बाद झाला. त्याची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केले. पहिली धाव पूर्ण केल्यानंतर खराब क्षेत्ररक्षणामुळे कर्णधार धोनीने दुसरी धाव घेण्याचा विचार केला, पण या दरम्यान ईशान किशनने उत्तम थ्रो करत त्याला धावचीत केले. त्यामुळे धोनीला ८ चेंडूत केवळ २ धावा करून माघारी परतावे लागले.

याबाबत बोलताना सचिन म्हणाला की चेन्नईच्या दृष्टीने सामना चांगला सुरु होता. त्यावेळी धोनी धावबाद झाला, तो सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. याशिवाय इतरही काही महत्वाच्या घटना सामन्यात घडल्या. मलिंगाने एका षटक अत्यंत महागडे टाकले, पण त्यानंतरही बुमराहने २ अतिशय चांगली षटके फेकली. आणि त्यातच मलिंगाने अंतिम षटक तर अतिशय उत्तमरित्या टाकले.

या आधी मुंबईने दोन वर्षांपूर्वी १२९ धावांचा अंतिम सामन्यात बचाव केला होता. त्यामुळे आम्ही सारेच याला खूप विश्वासाने सामोरे गेलो. आमच्या मुंबईचा संघ हा कमाल आहे.यात संघात युवा खेळाडूही आहेत आणि अनुभवी खेळाडूही आहेत. महेला जयवर्धने म्हणल्याप्रमाणे राहुल चहर हा प्रतिभावान गोलंदाज आहे. त्याने उत्तम गोलंदाजी केली आहे. आणि हार्दिक पांड्या हा तर कमालीचा खेळाडू आहे. अनेक सामन्यात आम्ही मागे पडलो असताना हार्दिकने आम्हाला सामना जिंकवून दिला आहे, हे विसरता येणार नाही, असेही सचिन म्हणाला.

दरम्यान, एका बाजूने गडी बाद असताना शेन वॉटसनचे मात्र संयमी खेळी करत झुंजार अर्धशतक ठोकले. अर्धशतकानंतर त्याने तुफान फटकेबाजी केली. वॉटसनने मलिंगचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे पहिल्या ३ षटकात मलिंगाने तब्बल ४२ धावा खर्च केल्या होत्या. पण अनुभवी असल्याने अंतिम षटकात ९ धावांची गरज असताना मलिंगा पुन्हा गोलंदाजीची आला. चेन्नईने पहिल्या ३ चेंडूवर ४ धावा काढल्या. पण चौथ्या चेंडूवर मात्र दुहेरी धाव घेताना वॉटसन ८० धावांवर धावचीत झाला. त्यानंतर सामना अत्यंत अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर २ धावा हव्या असताना मलिंगाने फलंदाजाला पायचीत करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अत्यंत संयमी सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या षटकात अखेर उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला. रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले. ४ षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत २९ धावा केल्या. डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने १ चौकार आणि १ षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती, पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या.

प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या. खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या. अखेर Birthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.