चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहने आपल्या आयपीएल कारकिर्दीमध्ये आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. विशाखापट्टणम येथे दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हरभजनने आयपीएलमध्ये १५० बळींचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी करण्यासाठी त्याला अवघ्या दोन विकेटची आवश्यकता होती. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हरभजनने शिखर धवन आणि रुदरफोर्डचा बळी घेत मानाच्या पंगतीत स्वतःचं स्थान पक्क केलं आहे.

आतापर्यंत आयपीएलमध्ये केवळ ३ गोलंदाजांनी १५० बळींचा टप्पा पूर्ण केला आहे. मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा १६९ बळींसह पहिल्या स्थानावर आहे. याव्यतिरीक्त अमित मिश्रा १५६ बळींसह दुसऱ्या तर पियुष चावला १५० बळींसह तिसऱ्या स्थानावर आहे. हरभजनने दिल्लीविरुद्ध सामन्यात दोन बळी घेत पियुष चावलाशी बरोबरी साधली आहे.