Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रविवारी संपला. या सामन्यात भारताला ६० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडने भारतापुढे चौथ्या डावात विजयासाठी ठेवलेल्या २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे भारतीय फलंदाजांना शक्य झाले नाही. या विजयाबरोबर इंग्लंडने कसोटी मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात अजिंक्य रहाणे बाद झाल्यावर भारताने रिव्ह्यू घेतला. पण तो रिव्ह्यू वाया गेला. या रिव्ह्यूनंतर तिसऱ्या पंचांचा निर्णय येईपर्यंत इंग्लंडचा संघ एकत्रित आला होता. तेवढ्यात पंचांनी रहाणेला बाद ठरवले. त्यामुळे आनंदाच्या भरात स्टोक्सने खेळाडूला मिठी मारली. त्यादरम्यान त्याच्या हाताचा गुद्दा आदिल रशीदला लागला. पण हे स्टोक्सला समजलेदेखील नाही. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी चौथ्या डावात अर्धशतके केली. विराट कोहली ५७ धावा करून बाद झाला, तर अजिंक्य रहाणे ५१ धावा करून बाद झाला. या दोघांनी १०१ धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी भारताला विजय मिळवणे सहज शक्य होईल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु त्यानंतर कर्णधार कोहली माघारी परतला. कोहलीला पंचांनी बाद घोषित केल्यावरही भारताने रिव्ह्यू घेतला होता. पण तोदेखील वाया गेला आणि पंचांचा निर्णय खरा ठरला.