केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून अद्याप काहीही ठोस हाती आलेलं नाही. परंतू बाहेर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाठींब्यात वाढ होताना दिसत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी शेतकऱ्यांना आपला पाठींबा दर्शवला आहे. याचसोबत भारतीचा बॉक्सर विजेंदर सिंहनेही शेतकरी आंदोलनाला आपला पाठींबा दर्शवत…काळे कायदे मागे न घेतल्यास आपला खेलरत्न पुरस्कार परत देण्याची घोषणा केली आहे.

३५ वर्षीय विजेंदरने शेतकरी आंदोलनस्थळाला भेट देऊन आपला पाठींबा जाहीर केला. विजेंदरला देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. “मी पंजाबचं खूप काही देणं लागतो. बॉक्सिंग खेळत असताना मी बराच कालावधी पंजाबमध्ये घालवला आहे. त्यामुळे या निमीत्ताने पंजाबला आणि शेतकऱ्यांना पाठींबा देऊन मी ऋण फेडण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांच्या मागण्यांना माझा पूर्ण पाठींबा आहे. संपूर्ण देशाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं रहायला हवं कारण ते देशाची लाईफलाईन आहेत.”

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधीत्व करताना मी जे यश मिळवलं त्यासाठी मला खेलरत्न पुरस्कार मिळाला. पण सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वागवत आहे ते पाहता निषेध म्हणून मी माझा पुरस्कार आणि त्यानिमीत्ताने मिळणारे सर्व लाभ परत करेन. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा अशी माझी विनंती आहे. सर्व खेळाडूंनीही शेतकऱ्यांच्या या मागणीला पाठींबा दर्शवावा अशी मागणी विजेंदरने केली.