भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याने क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम केले आहेत. विश्वचषक विजयात युवराजचा सिंहाचा वाटा राहिला होता. भारताच्या सध्याच्या संघात त्याचा समावेश नसला तरी आपल्या सहकारी खेळाडूंसोबत त्याचे चांगले मैत्रिपूर्ण संबंध आहेत. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि युवराज हे दोघेही चांगले मित्र आहेत. युवराजने नुकतेच ‘रेडिओ मिर्ची’ला दिलेल्या मुलाखतीत संघातील सहकाऱयांसोबतचे मैदानाबाहेरचे काही अनुभव आणि त्यांचे गुपित उघड केले.

संघातील खेळाडूंमध्ये सर्वात कंजूषपणा कोण करायचा? असा सवाल युवराज याला विचारण्यात आल्यानंतर त्याने त्वरित विराट कोहलीचे उदाहरण दिले. युवराज म्हणाला की, संघात कंजूषपणा अनेकजण करायचे पण कुणाचे नाव मी घेणार नाही. विराटचे नाव बिनदिक्कतपणे मी घेऊ शकतो, कारण केवळ संघ सहकारी म्हणून नाही, तर वैयक्तिक आयुष्यात देखील तो माझा चांगला मित्र आहे. आम्ही कुठेही शॉपिंगला एकत्र गेलो की सहसा तुझे तू पैसे द्यायचे असे आमच्यात नसते, ज्याच्या मनात येईल तो सर्वांचे पैसे भरत असे, पण विराट नेहमी पैसे भरायला कंजूषपणा करायचा. नेहमी मलाच सर्व ठिकाणी बिल भरावे लागायचे, असे मिश्किलपणे युवराजने सांगितले.

वाचा: ‘लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी भारताच्या डावाला सुरूवात करावी’

आशिष नेहराने देखील त्याच्या लग्नानंतर कंजूषपणाला सुरूवात केली होती, असेही युवराज म्हणाला. आशिष लग्नाआधी खर्च करायला घाबरत नसे, पण त्याचे लग्न झाल्यानंतर तो खूपच कंजूषपणा करायला लागला. आता तुम्हाला समजायला हवे मला आता माझ्या पत्नी आणि मुलांकडेही पाहावे लागते, मला जास्त खर्च करता येणार नाही, असे आशिष नेहरा सांगायचा. यासोबतच युवराजने मैदानाबाहेरचे अनेक प्रसंग देखील मुलाखतीत सांगितले. ड्रेसिंगरुममध्ये विराटसोबतच्या मस्तीचेही किस्से युवराजने यावेळी कथन केले.