कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ गडी राखून मात केली आहे. ७ गडी राखून पहिला सामना जिंकत भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विंडीजने दिलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद ९४ तर लोकेश राहुलने ६२ धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सावध सुरुवात केली होती. सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या ८ धावा काढून माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेत महत्वपूर्ण भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. यादरम्यान लोकेश राहुलने विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपलं अर्धशतकही साजरं केलं. तो ६२ धावा काढून माघारी परतला. अवश्य वाचा - IND vs WI : लोकेश राहुल टीम इंडियाचा नवा हजारी मनसबदार यानंतर विराटने ऋषभ पंतच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताचं आव्हान कायम ठेवलं. ऋषभ पंतनेही फटकेबाजी करत १८ धावा केल्या. पंत माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतला. यानंतर विराटने शिवम दुबेच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ८ चेंडू बाकी ठेवत भारताने या सामन्यात बाजी मारली. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला हा भारताचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग ठरलेला आहे. विंडीजकडून पेरीने २ तर कायरन पोलार्ड आणि शेल्डन कोट्रलने १ बळी घेतला. त्याआधी, शेमरॉन हेटमायरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला एविन लुईस आणि कायरन पोलार्डने दिलेल्या दमदार साथीच्या जोरावर पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने २०७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लेंडल सिमन्सला माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी चांगली सुरुवातही केली होती. मात्र लुईस-हेटमायर आणि पोलार्ड या त्रिकुटाने हैदराबादच्या मैदानात चौफेर फटकेबाजी करत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. अवश्य वाचा - IND vs WI : एविन लुईसची धडाकेबाज खेळी, भारताविरुद्ध विक्रमाची नोंद लेंडल सिमन्स दिपक चहरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लुईसने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत फटकेबाजी सुरुवात केली. पाचव्या षटकात विंडीजने ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला. ४० धावांवर एविन लुईस वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर ब्रँडन किंग आणि हेटमायर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. किंग माघारी परतल्यानंतर हेटमायरनेही भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत आपल्या संघाचं पारडं जड केलं. त्याला कर्णधार पोलार्डनेही उत्तम साथ दिली. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी काही सोपे झेलही सोडले. भारताकडून युजवेंद्र चहलने २ तर वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी १-१ बळी घेतला. अवश्य वाचा - IND vs WI : टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहर नकोशा विक्रमाचा धनी