सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियात सध्या चिंतेचं वातावरण आहे. शिखर धवनच्या जागी लोकेश राहुलला सलामीला पाठवण्याचा उपाय भारतीय संघाकडे आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोणी यायचं यावरुन अनेक मतमतांतर होती. शिखर धवनला पर्याय म्हणून ऋषभ पंतच्या नावाची चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली. धवनची दुखापत बरी होण्यासाठी किमान १०-१२ दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे बीसीसीआयने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र ऋषभ पंतला धवनचा पर्याय म्हणून इंग्लंडला पाठवायचं की नाही यावरुन निवड समिती आणि संघ व्यवस्थापन यांच्यात बेबनाव असल्याचं उघड झालं आहे.

शिखर धवनच्या दुखापतीची बातमी समोर आल्यानंतर, संघ व्यवस्थापन त्याच्या जागी पर्यायी खेळाडूची निवड करण्याच्या विरोधात होतं. शिखरसाठी पर्यायी खेळाडूची निवड केली. तर उपांत्य फेरीसाठी शिखर भारतासाठी उपलब्ध होणार नाही असा संदेश जाण्याची व्यवस्थापनाला भीती होती. मात्र शिखरच्या हाताला प्लास्टर घातल्यानंतर, त्याची दुखापत बरी होण्यास वेळ लागेल हे व्यवस्थापनाच्या ध्यानात आलं. यानंतर सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत ऋषभ पंतच्या पर्यायाची घोषणा केली. पीटीआयने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : ‘गब्बर’ कमबॅक करेल, विराट कोहली प्रचंड आशावादी

शिखर धवन दुखापतीमधून सावरला नाही तर भारताला पर्यायी खेळाडूची गरज लागणार आहे, यासाठी अखेर पंतला विश्वचषकासाठी पाठवण्याचं ठरवलं. पंतच्या नावाची घोषणा करण्यासाठी बीसीसीआयला आधी क्रिकेट प्रशासकीय समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंत गुरुवारी इंग्लंडसाठी रवाना झाला आहे.

अवश्य वाचा – शास्त्री गुरुजींना BCCI कडून बक्षीस, प्रशिक्षकपदावर मुदतवाढ