रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला, ज्यामध्ये गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूझीलंडचा डाव ३४.३ षटकात केवळ १०८ धावांवर आटोपला. अवघ्या १५ धावांवर किवी संघाने ५ विकेट गमावल्या होत्या. ज्यामध्ये मोहम्मद शमीसह मोहमद सिराजने देखील शानदार गोलंदाजी केली. त्यांच्या या कामगिरीबाबत विरोधी संघाचा कर्णधार टॉम लॅथमदेखील सामन्यानंतर बोलताना प्रशंसा केली.

या सामन्यात मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करताना ६ षटकात १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मोहम्मद सिराजनेही टिच्चून मारा करताना ६ षटकात १० धावा देत एक विकेट घेतली. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांचे कौतुक केले. तो म्हणाला, त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. जे आमच्यासाठी निर्दयी ठरले.

दुसऱ्या वनडे सामन्यानंतर लॅथम म्हणाला, “जेव्हाही शमी आणि सिराज संघात असतात तेव्हा ते स्पष्टपणे दर्जेदार गोलंदाज म्हणून पुढे येतात. लाईन आणि लेंथवरवर गोलंदाजी करण्यात दोघेही ‘निर्दयी’ होते. त्यांनी आम्हाला धावा करण्याची संधी दिली नाही. सुदैवाने त्यांचा दिवस होता आणि दुर्दैवाने आम्ही त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्यातअयशस्वी झालो.”

न्यूझीलंडच्या कर्णधार पुढे म्हणाला, ”भागीदारी न झाल्यामुळे संघाला नुकसान सहन करावे लागले. पहिल्या फळीतील फलंदाजांसाठी दिवस चांगला नव्हता. भारताने सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला धावा करण्याची संधी दिली नाही. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळत होती.”

हेही वाचा – IND vs NZ ODI: टीम इंडियाच्या ‘या’ स्टाईलने रमीझ राजा प्रभावित; म्हणाले, ‘पाकिस्तानसह इतर संघांनीही…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील वेगवान आक्रमणाने चमकदार कामगिरी केली. त्याचबरोबर न्यूझीलंडला १०८ धावांत गुंडाळले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या ५१ चेंडूत ५० धावा आणि शुबमन गिलच्या नाबाद ४० धावांच्या जोरावर भारताने लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला. भारताने हा विजय अवघ्या २०.१ षटकांत १११ धावा करत मिळवला.