भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि रनमशीन असलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान विराट कोहली आणि संपूर्ण आरसीबी संघाने चाहत्यांनी १८ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर आयपीएल २०२५ चं जेतेपद पटकावलं. या विजयानंतर विराटला त्याच्या कसोटी निवृत्तीबद्दल प्रश्न विचारताच त्याने मोठं वक्तव्य केलं. यावर आता आंद्रे रसेलनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आरसीबी चॅम्पियन झाल्यावर विराट कोहली भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक क्षण अनुभवत होता. परंतु त्यानंतर त्याने जे सांगितलं ते सर्वांनाच थक्क करून टाकणारं होतं. या दिग्गज खेळाडूने म्हटले होते की आरसीबी पहिल्यांदाच चॅम्पियन होणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, पण तरीही ते कसोटी क्रिकेटपेक्षा पाचपट खालच्या स्तरावर आहे. मला कसोटी खेळणं सर्वात जास्त आवडतं. यावर वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने समर्पक उत्तर दिले आहे.

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने विराट कोहलीच्या विधानावर आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की विराट कोहलीसारखे खेळाडू कसोटी क्रिकेटला इतके महत्त्व देतात कारण ते भारतासारख्या देशाकडून खेळतात, जिथे क्रिकेट बोर्ड त्यांच्या कसोटी खेळाडूंना भरपूर पैसे देते.

एका मुलाखतीदरम्यान आंद्रे रसेल म्हणाला, “मला वाटतं की भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडसारख्या देशांमध्ये कसोटी खेळाडूंची खूप चांगली काळजी घेतली जाते. जे वेस्ट इंडिजसारख्या देशांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.”

पुढे तो म्हणाला, “या सर्व क्रिकेटपटूंना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्तम केंद्रीय करार मिळतात. जर त्यांना अशी संधी मिळाली तर त्यांना खेळायला नक्कीच आवडेल. पण वेस्ट इंडिजचे खेळाडू ५० किंवा १०० कसोटी सामने खेळले तरी निवृत्तीनंतर त्यांच्याकडे दाखवण्यासाठी फारसे काही नसते. अर्थात तुम्हाला आरामदायी जीवन जगता येईल आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घेता येईल, याची खात्री तर करावीच लागते.”

“कसोटी क्रिकेट मलाही आवडतं, पण शेवटी, मी एक प्रोफेशनल आहे. तो माझ्या कारकिर्दीचा भाग नव्हता. मला कोणताही पश्चात्ताप नाही कारण मी कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवली नाही,” रसेल म्हणाला.

“मला मुळात कसोटी संघातून बाहेर काढण्यात आले. त्यांनी माझ्याकडे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिलं आणि तसंच झालं,” तो पुढे म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंद्रे रसेलने २०१० मध्ये वेस्ट इंडिजसाठी कसोटी पदार्पण केले होते, परंतु त्याला आतापर्यंत फक्त एकच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. तो म्हणाला की त्याला थेट कसोटी संघातून वगळण्यात आले कारण बोर्डाला वाटले की तो फक्त पांढऱ्या चेंडूसाठीच फिट आहे.