नवी दिल्ली : भारताचा युवा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीने २८०० एलो गुणांचा टप्पा पार करण्याची किमया साधली आहे. ही अलौकिक कामगिरी करणारा तो विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय, जगातील १६वा बुद्धिबळपटू ठरला आहे. जागतिक क्रमवारीत एरिगेसी चौथ्या स्थानावर आहे.

या वर्षी चांगल्या लयीत असलेल्या २१ वर्षीय एरिगेसीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवण्यासह भारताला जेतेपद मिळवून देण्यात निर्णायक भूमिका पार पाडली. ‘‘अर्जुन एरिगेसी पारंपरिक बुद्धिबळात २८०० एलो गुणांचा टप्पा पार करणारा इतिहासातील १६वा खेळाडू ठरला. पाच जगज्जेतेपद मिळवणाऱ्या विश्वनाथन आनंदनंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.

हेही वाचा >>> Kraigg Brathwaite : क्रेग ब्रेथवेटने मोडला गॅरी सोबर्सचा ५२ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक विक्रम! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच कॅरेबियन खेळाडू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिसेंबर २०२४च्या ‘फिडे’ रेटिंग यादीत त्याचे २८०१ गुण आहेत,’’ असे जागतिक बुद्धिबळ संस्था ‘फिडे’ने ‘एक्स’वर लिहिले. एरिगेसीने १४ वर्षे ११ महिने १३ दिवसांचा असताना ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. सप्टेंबर २०२४ मध्ये तो क्रमवारीत भारताचा अव्वल बुद्धिबळपटू ठरला होता. जागतिक क्रमवारीत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन (२८३१ एलो गुण), अमेरिकेचा फॅबियानो कारूआना (२८०५) आणि हिकारू नाकामुरा (२८०२) हे एरिगेसीच्या पुढे आहेत. जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनाला आव्हान देणारा भारताचा गुकेश २७८३ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. लिरेन (२७२८) क्रमवारीत २२व्या स्थानी आहे.