रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई इंडियन्स संघाचा अवघ्या ५ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. एलिस पेरीच्या शानदार ६६ धावांच्या जोरावर प्रथम फलंदाजी करत ६ बाद १३५ धावा केल्या. त्यानंतर २० षटकांत १३६ धावांचे मुंबईला दिलेले सर्वात कमी लक्ष्याचा आरसीबी संघाने बचाव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. आरसीबीकडून अनुभवी आशा शोभना अखेरचे षटक टाकत होती आणि तिने या षटकात ६ धावा देत १ विकेटही मिळवली ज्यामुळे संघाला शानदार विजय मिळवला आला. विजयानंतर तिने केलेल्या सेलिब्रेशनने चाहत्यांना सूर्याची आठवण करून दिली.

– quiz

कर्णधार स्मृती मानधनाने आशा शोभनाला शेवटचे षटक टाकण्याची संधी दिली. सामन्याच्या अखेरच्या षटकात मुंबई संघाला १२ धावांची गरज होती. आशाने किफायतशीर गोलंदाजी करत केवळ ६ धावा संघाला दिल्या आणि एकही मोठा शॉट मारण्याची संधी फलंदाजाला दिली नाही. तर तिच्या गोलंदाजीवर विकेटकिपर रिचा घोषने विस्फोटक फलंदाज सजना सजीवन हिला स्टंपिंग करत बाद केले. शेवटच्या चेंडूवरही मुंबई संघाला १ धाव घेता आली आणि आरसीबीचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला.

सामन्यातील अखेरच्या चेंडूनंतर सर्व संघाने एकच जल्लोष केला पण शोभनाच्या सेलिब्रेशनने साऱ्यांचे लक्ष वेधले. तिने तिच्या अॅक्शनमधून ‘मी आहे इथे चिंता करू नको’असं सांगण्याचा प्रयत्न करत होती. आयपीएल २०२० मधील मुंबई इंडियन्स विरूध्द आरसीबीच्या एका सामन्यात सूर्यकुमार यादवने संघाला विजय मिळवून दिला होता, तेव्हा त्यानेसुध्दा असेच काहीसे सेलिब्रेशन केले होते. तिच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

आशा शोभनाने सामन्यानंतर सांगितले की, २०वे षटक सुरू होण्यापूर्वी स्मृतीने तिला विचारले, तू २०वे षटक टाकशील का? मी म्हणाली, “हो नक्कीच, काळजी नका करू.” आशा शोभना हिने यंदाच्या महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्ज संघाविरूध्द ५ विकेट्स घेत इतिहास रचला होता. आशा शोभनाने या सामन्यातील १३वे षटक टाकले होते, ज्यात तिला पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला होता. त्यानंतर तिला षटक टाकण्याची संधी मिळाली नव्हती. पण स्मृतीने तिच्यावर विश्वास दाखवत तिला थेट अखेरचे आणि महत्त्वाचे षटक दिले.

तत्त्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबी संघाने एलिस पेरीच्या (६६) अर्धशतकाच्या जोरावर १३५ धावा केल्या. पेरीशिवाय आरसीबीच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा पल्ला गाठता आला नाही. पण आरसीबीच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवरील वेयरहमचा षटकार खूपच महत्त्वाचा ठरला. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेला मुंबई संघ १८व्या षटकात हरमनप्रीत कौरची विकेट गमावेपर्यंत सामन्यात पुढे होता. हरमन आऊट होताच आरसीबीने या सामन्यात पकड घट्ट केली आणि मुंबईला १३० धावांवर रोखले. आता जेतेपदाच्या लढतीत आरसीबीचा सामना १७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.