Asia Cup 2022 IND vs PAK: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक २०२२ मध्ये आणखी एक मोठा विक्रम रचणार आहे. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी मैदानात उतरताच हा विक्रम विराटच्या नावे होईल, त्यामुळे आजचा सामना विराटसाठी खरोखरच खास असणार आहे. विराटच्या आधी न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलर याने हा विक्रम केला होता. आजच्या सामन्यानंतर हा रेकॉर्ड करणारा विराट जगातील दुसरा व भारतातील पहिला वाहिला खेळाडू ठरणार आहे. स्वतः ए. बी. डिव्हिलियर्स याने सुद्धा सामन्यापूर्वी विराटचे अभिनंदन करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आज दुबई मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात उतरताच टी२० मालिकांच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळण्याचा विक्रम विराट रचणार आहे. आतापर्यंत जागतिक स्तरावर अवघ्या १३ क्रिकेटपटूंनी १०० किंवा त्याहून अधिक टी २० सामने खेळले आहेत. पण या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा न्यूझीलंडचा रॉस टेलर हा एकमेव खेळाडू होता.

विराटचा टी-२० मधील आजवरचा प्रवास

विराट कोहलीने १२ जून २०१० रोजी झिम्बाब्वे विरुद्ध टी२० स्पर्धेमध्ये टीम इंडियाकडून पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ५०.१२ च्या सरासरीने ३३०८ धावा केल्या आहेत. या आकडेवारीसह आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने २०२२ मार्चमध्ये मोहाली येथे श्रीलंकेविरुद्ध १०० वा कसोटी सामना खेळला तर यापूर्वी त्याने २६२ एकदिवसीय सामने खेळात १२, ३४४ धावा केल्या आहेत. (Asia Cup 2022 IND Vs PAK LIVE: सिनेमागृहात पहा भारत-पाकिस्तान सामना; तुमच्या शहरात कुठे कराल बुकिंग?)

विराट कोहलीच्या या विक्रमाच्या आधी जगभरातून माजी कर्णधारावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यातच आरसीबीमधील विराटचा पार्टनर ए. बी. डिव्हिलियर्स याने सुद्धा खास व्हिडीओ बनवून अभिनंदन केले आहे. “तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनल्याबद्दल माझा खूप चांगला मित्र विराट कोहली याचे अभिनंदन करतो विराटची ही अप्रतिम कामगिरी आहे! आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे. १०० व्या सामन्यातील विराटची खेळी पाहण्यासाठी उत्सुक आहे” असे डिव्हिलियर्सने व्हिडीओमध्ये म्हंटले.

ए. बी. डिव्हिलियर्स व्हिडीओ

अलीकडे काही सामन्यांमध्ये विराटचा फॉर्म बिघडल्याने भारताच्या इंग्लंड दौऱ्याच्या समाप्तीनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. आगामी आशिया चषक २०२२ मध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुनरागमन करणार आहे.