भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अखेर शतक झळकावलं असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१ व्या शतकाची नोंद केली आहे. ७१ व्या शतकासाठी विराट कोहलीला तब्बल १०२० दिवस म्हणजेच जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ वाट पहावी लागली. पण आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात विराटचा शतकदुष्काळ अखेरीस आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील विराट कोहलीचे हे पहिले शतक ठरले.

अफगाणिस्तानविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे कोहलीला केएल राहुलच्या साथीने सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याने सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी वेळ घेतला. पहिल्या १० चेंडूंत त्याने केवळ १० धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र त्याने धावांची गती वाढवली. त्याने ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. मग पुढील २१ चेंडूंत त्याने आणखी ५० धावांची भर घालताना ५३ चेंडूंत आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने या औपचारिक सामन्यात अफगाणिस्तान संघाचा १०१ धावांनी धुव्वा उडवला.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : शतकदुष्काळ संपुष्टात! ; तब्बल १०२० दिवसांनंतर कोहलीला यश; भारताचा अफगाणिस्तानवर १०१ धावांनी विजय  

सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत के एल राहुलला विराट कोहलीने अफगाणिस्तानविरोधात केलेली खेळी आणि आयपीएलमधील अनुभव लक्षात घेता टी-२० सामन्यांमध्ये सलामीला यावं का? असं विचारण्यात आलं. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून सलामीसाठी खेळताना विराट कोहलीने पाच शतकं केली आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना के एल राहुलने, “मग मी काय बाहेर बसू का?” अशी विचारणा केली.

विराट कोहलीला आपली लय गवसणं संघासाठी फार महत्त्वाचं होतं, हे अधोरेखित करताना के एल राहुलने विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळतानाही धावा करु शकतो असं नमूद केलं.

“विराट कोहलीने धावा करणं संघासाठी नक्कीच फायद्याचं आहे. आज ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली, ते पाहून त्याला स्वत:लाही आनंद झाला असेल. तो आपल्या खेळावर मेहनत घेत होता आणि आज त्याचं फळ मिळालं,” असं के एल राहुलने म्हटलं आहे.

PHOTOS : ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी कोहलीला पाहावी लागली तब्बल ‘इतक्या’ दिवसांची वाट

“दोन ते तीन चांगल्या खेळी केल्यानंतर तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. तो चांगला खेळला याचा आनंद आहे. तुम्ही इतक्या काळापासून विराटला पाहत आहात, तो फक्त सलामीला खेळला तरच शतक करेल असं काही नाही. तिसऱ्या क्रमांकावर आल्यानंतरही तो शतक करु शकतो. आपण काय भूमिका निभावतो हे महत्त्वाचं आहे,” असं राहुलने म्हटलं.

पुढे बोलताना त्याने सांगितलं की, “विराटला नक्कीच दिलासा मिळाला असेल. गेल्या दोन वर्षात त्याचा स्वभाव, मानसिकता आणि खेळाप्रती नैतिकता यात कोणतेही बदल झालेले नाहीत. खेळासाठी करणाऱ्या तयारीतही त्याने कोणते बदल केलेले नाहीत. आम्हीदेखील नेहमी आकड्यांचा विचार करत असतो. जर तीन आकडा पार करु शकलो, तरच तो खेळाडू फॉर्ममध्ये आहे असा विचार करतो. पण त्याने गेल्या दोन ती वर्षात संघासाठी मोठं योगदान दिलं आहे”.

विराट कोहली नेहमी आव्हानांचा सामना करणारा खेळाडू आहे. विराटने ज्या पद्धतीने उभारी घेतली आहे, ते आपल्या सर्वांसाठी शिकण्यासारखं आहे असंही त्याने सांगितलं. त्याने शतक केलेलं पाहून ड्रेसिंग रुममधील आम्हाला कोणालाही आश्चर्य वाटलं नाही, यामधून त्याला अजून आत्मविश्वास मिळेल अशी आशा राहुलने व्यक्त केली.