CA has reaffirmed its willingness to host a bilateral series between IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच खूप उत्सुक असतात. पण दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध फक्त कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत खेळताना दिसतात, मग तो आशिया चषक असो, टी-२० विश्वचषक असो किंवा एकदिवसीय विश्वचषक असो. दोन्ही देशांच्या संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. पण आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची विशेष इच्छा व्यक्त केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती. तेव्हापासून दोन्ही संघ फक्त आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील २०२२ टी-२० विश्वचषक सामन्याच्या मेगा यशानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया अत्यंत आनंदी आहे, जिथे शेवटच्या चेंडूपर्यंत ९०,२९३ चाहत्यांनी थ्रिलर पाहिला. त्या सामन्यात विराट कोहलीने ८२* धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. सीए, मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीजी ऑपरेटर) आणि व्हिक्टोरियन सरकारने आता एमसीजी येथे या दोन संघांमधील सामन्यात स्वारस्य व्यक्त केले आहे, जे त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करू शकेल.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे (सीए) सीईओ निक हॉकले म्हणाले की, संधी मिळाल्यास प्रतिष्ठित एमसीजीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यातआनंद होईल. ते म्हणाला, ‘मला वाटतं एमसीजीमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी जे कोणी इथे आले होते, ते अविस्मरणीय आठवणीसह माघारी परतले होते. त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा सामना बघायचा आहे. आम्हाला संधी मिळाल्यास आम्हाला ते होस्ट करायला आवडेल. या दोन देशांमधील मालिका होस्ट करण्याची संधी मिळाली, तर ही भूमिका पार पाडायला आम्हाला आवडेल.

हेही वाचा – IPL 2024 : पंजाबविरुद्धच्या विजयानंतर विराटने नाराज शिखरला मारली मिठी, VIDEO होतोय व्हायरल

हॉकले म्हणाले की, ‘आम्ही पाकिस्तानचे यजमानपदासाठी खूप उत्सुक आहोत. भारताचे यजमानपदासाठी आम्ही उत्सुक आहोत. जर आम्ही मदत करू शकलो तर ते छान आहे. पण मला वाटते की ही एक द्विपक्षीय मालिका आहे.’ सीए इव्हेंट्सचे प्रमुख पीटर रोच यांनी मंगळवारी कबूल केले की ऑस्ट्रेलियाला तटस्थ द्विपक्षीय मालिकेऐवजी तिरंगी मालिका आयोजित करण्यात स्वारस्य आहे, जी भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९९९-२००० हंगामात शेवटची झाली होती, परंतु सध्याच्या फ्युचर टूर्स प्रोग्राम (एफटीपी) मध्ये पुरेशी जागा नसल्याचे त्यांनी सांगितले.