India vs England 1st Test: भारतीय संघ येत्या २० जूनपासून इंग्लंडविरूद्ध ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन हात करताना दिसून येणार आहे. मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. ही आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ साखळीतील भारतीय संघाची पहिलीच मालिका असणार आहे. इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या मालिकेआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे या दौऱ्यावर भारतीय संघाची चांगलीच कसोटी लागणार आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज असणार आहे. भारतीय संघाला इंग्लंडमध्ये जाऊन मालिका जिंकायची असेल, तर जसप्रीत बुमराहने विकेट्स काढणं गरजेचं असणार आहे. बुमराह या मालिकेतील ५ पैकी ३ सामने खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना बुमराहपासून सावध राहावं लागेल. मात्र, इंग्लंडचा माजी खेळाडू निक नाईटच्या मते बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाने बुमराहपासून नव्हे, तर कुलदीप यादवपासून सावध राहण्याची गरज आहे.

निक नाईटने पीटीआयशी बोलताना म्हटले की,” भारतीय संघाला २० गडी बाद करावे लागतील. त्यासाठी कुलदीप यादवला शक्य होईल तितके सामने खेळवावे लागतील. कारण सामना जसजसा पुढे जाईल, तशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरेल. अशा परिस्थितीत इंग्लंडचे फलंदाज त्याचा सामना करणं टाळण्याचा प्रयत्न करतील. गेल्या वेळी जेव्हा भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता, त्यावेळी भारतीय संघाचा गोलंदाजीक्रम मजबूत होता. भारतीय संघ जर मालिका जिंकण्याच्या विचारात असेल, तर त्यांनी फलंदाजीसह गोलंदाजी आक्रमणावर अधिक भर द्यावा.”

तसेच ते पुढे म्हणाले, ” जर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी चेंडू फिरत असेल, तर कुलदीप यादव इंग्लंडच्या फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. इंग्लंडचे फलंदाज कुलदीपची गोलंदाजी खेळणं टाळण्याचा प्रयत्न करतील.” यावेळी भारतीय कुलदीप यादव हा एकमेव फिरकी गोलंदाज असणार आहे. कारण रवींद्र जडेजाला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान दिलं जाईल. वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती असणाऱ्या इंग्लंडमध्ये कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.