Ravi Shastri Reaction On Shubman Gill: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर गिलच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री शुबमन गिलच्या पाठीशी आहेत.
शुबमन गिलला रवी शास्त्रींचा सपोर्ट
रवी शास्त्री यांच्या मते, भारतीय संघाने सामना गमावला असला मालिकेत ०–१ पिछाडीवर असलो तरीदेखील आपण त्याला वेळ द्यायला हवा. अनुभवाने त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल असं रवी शास्त्री यांचं म्हणणं आहे. विजडनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “ त्याला ३ वर्ष संघात राहू द्या. मालिकेचा निकाल काहीही असो, बदल करू नका. मला वाटतं तुम्ही त्याला ३ वर्ष सोबत ठेवा तो नक्कीच चांगली कामगिरी करेल.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “ मी त्याला टॉस दरम्यान आणि पत्रकार परिषदेत पाहिलं आहे. तो खूप परिपक्व झाला आहे. बीसीसीआयने गिलबाबत संयम ठेवणं खूप गरजेचं आहे.”
रोहितच्या निवृत्तीनंतर शुबमन गिलला संधी
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वीच, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. शुबमन गिलकडे वनडे आणि टी –२० संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव होता. मात्र तो पहिल्यांदाच कसोटी संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. कर्णधार म्हणून त्याने पहिल्याच सामन्यात दमदार शतकी खेळी केली. भारतीय संघ या सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचला होता. मात्र, क्षेत्ररक्षकांनी सोडलेले झेल भारतीय संघाला चांगलेच महागात पडले. भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला. यासह इंग्लंडने १–० ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.