183 Inning By virat kohli is best among all white ball Innings by any indian batter: रविवारी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने होते. मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता उर्वरित सामना उद्या (सोमवार) राखीव दिवशी होणार आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे कौतुक करत मोठे वक्तव्य केले आहे. आशिया चषक २०१३ मध्ये कोहलीच्या १८३ धावांच्या खेळीला गंभीरने रोहित शर्माच्या द्विशतकापेक्षा सरस ठरवले आहे.

गौतम गंभीरने हे विधान अशा वेळी दिले केले, जेव्हा भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२३ सुपर फोर सामना पावसामुळे थांबला होता. या खेळीनंतर भारताने अनेक द्विशतके झळकावली, पण विराट कोहलीची ही खेळी खूप खास होती, कारण ही खेळी एका चांगल्या बॉलिंग लाइनअपविरुद्ध दबावाखाली खेळली गेली होती, असे गंभीरने म्हटले आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २४.१ षटकांत २ गडी गमावून १४७ धावा केल्या. सध्या केएल राहुल २८ चेंडूत १७ धावा आणि विराट कोहली १६ चेंडूत ८ धावा काढून नाबाद आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे.

हेही वाचा – IND vs PAK: जसप्रीत बुमराहच्या मुलाला शाहीन आफ्रिदीकडून मिळाले खास गिफ्ट! पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला VIDEO

तसेच रोहित शर्मा आणि शुबमन गिलचे तुफान पाहायला मिळाले. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याचवेळी पाकिस्तानी गोलंदाजांची लय बिघडली. रोहित आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी शादाब खानने मोडली. त्याने कर्णधार रोहितला बाद केले.

हिटमॅन रोहित शर्माने बाद होण्यापूर्वी आपले ५० वे अर्धशतक झळकावले. त्याने बाद होण्यापूर्वी ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. त्याचवेळी शुबमनने एकदिवसीय कारकिर्दीतील आठवे अर्धशतक झळकावले. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुबमन ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा करून बाद झाला.