दुबई : कसोटी सामन्यांत षटकांच्या धिम्या गतीवर आळा राखण्यासाठी आता ‘स्टॉप क्लॉक’चा वापर करण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) निर्णय घेतला आहे. ‘आयसीसी’ने अन्यही काही नियमबदल जाहीर केले असले, तरी चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेच्या वापरास बंदी मात्र कायम आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या नव्या २०२५ ते २०२७च्या पर्वासाठी या नियमांचा अवलंब केला जाणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक’चा वापर केला जात होता. आता हा नियम कसोटीतही लागू केला जाणार आहे.

दरम्यान, चेंडूवर लाळेच्या वापरास बंदी कायम आहे. मात्र, या नियमात थोडा बदल करण्यात आला आहे. पूर्वी चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यावर पंचांना त्वरित चेंडू बदलावा लागत होता. मात्र, आता चेंडू बदलणे अनिवार्य नसेल असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे. तसेच एखाद्या फलंदाजाने ‘शॉर्ट’ धाव घेतल्यास कोणता फलंदाज ‘स्ट्राइक’वर असणार याबाबतचा निर्णय आता प्रतिस्पर्धी संघाकडून घेतला जाईल.

रिव्ह्यूबाबतही बदल

‘रिव्ह्यू’च्या नियमातही बदल करण्यात आला आहे. आधीच्या नियमानुसार, चेंडू बॅटला लागून यष्टिरक्षकाकडे गेल्याचे वाटल्याने पंचांनी फलंदाजाला बाद ठरवले आणि फलंदाजाने ‘रिव्ह्यू’ मागितल्यावर चेंडू बॅटऐवजी पॅडला लागल्याचे दिसल्यास त्याला थेट नाबाद ठरवले जायचे. मात्र, नव्या नियमानुसार, चेंडू बॅटऐवजी पॅडला लागल्याचे दिसल्यास तिसरे पंच ‘पायचीत’साठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा अवलंब करतील. या प्रक्रियेअंती फलंदाज पायचीत असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याला बाद ठरविण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नियम काय?

‘स्टॉप क्लॉक’च्या नियमानुसार, एका षटकाच्या समाप्तीनंतर ६० सेकंदांच्या आत दुसऱ्या षटकाला सुरुवात होणे अनिवार्य असेल. मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर ही वेळ दाखवली जाईल, असे ‘आयसीसी’ने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले. अशा चुकीसाठी पंचांकडून दोन वेळा ताकीद दिली जाईल. तिसऱ्यांदा अशी चूक झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला पाच गुण बहाल केले जातील. ८० षटकांनंतर ताकीद रद्द होईल आणि पुन्हा नव्याने नियम लागू करण्यात येईल.