सलामीवीर जॉनी बेअरस्टोचं आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने भारताविरुद्धच्या सामन्यात ३३७ धावांपर्यंत मजल मारली. ३३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने दमदार शतक ठोकले. रोहितचे हे या विश्वचषक स्पर्धेतील तिसरे शतक ठरले. या सामन्यात ऋषभ पंतलाही संधी देण्यात आली. पंतने चांगली सुरुवात केली पण मोठा फटका खेळताना तो बाद झाला.
कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. विजय शंकर याच्या जागी त्याला संधी देण्यात आली होती. त्या संधीचे सोने त्याला करता आले नाही. आवश्यक धावगती लक्षात घेता त्याने मोठा फटका खेळला. चेंडू सीमारेषेपार जातो असे वाटत असतानाच वोक्स धावत आला आणि त्याने अत्यंत चपळतेने चेंडू झेलला. पंतने ४ चौकारांसह २९ चेंडूत ३२ धावांची खेळी केली.
How good was this catch from Chris Woakes?! #CWC19 | #WeAreEngland | #ENGvIND pic.twitter.com/OpjoM36oC6
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 30, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा पुरता समाचार घेतला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत खोऱ्याने धावा ओढल्या. अखेरीस कुलदीप यादवने जेसन रॉयला माघारी धाडत इंग्लंडची जोडी फोडली. बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने रॉयला सुरेख झेल टिपला. यानंतर बेअरस्टो आणि जो रुट जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. बेअरस्टोने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं.
अखेरीस कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. शमीने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत बेअरस्टोला माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ३०० पल्याड धावसंख्या गाठेल अशी खात्री असलेला इंग्लंडचा संघ अचानक संकटात सापडला. मात्र बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला.
पुन्हा एकदा मोहम्मद शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. मात्र दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना माघारी धाडत शमीने इंग्लंडला आणखी धक्के दिले. अखेरीस ५० षटकात इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत रोखण्यात भारत यशस्वी ठरला. भारताकडून मोहम्मद शमीने निम्मा संघ गारद केला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली.