टी२० विश्वचषकात भारतीय संघाने सलग दुसरा सामना जिंकून विश्वचषकातील आपली विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे.  मात्र कर्णधार रोहितचा खराब फॉर्म सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यात त्याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-११ मध्ये कुठलाही बदल केला नाही. भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सची सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने गटातील स्थान भक्कम केले आहे. भारताच्या या विजयानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे.

नेदरलँड्सवरील विजयानंतरही मात्र तो खूप नाराज असल्याचे दिसून आले. प्रेसेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना त्याने “मी स्वतःच्याच फलंदाजीवर खूप निराश असून त्यावेळी अधिक मोठे फटके मारणे गरजेचे होते”, असे त्याने म्हटले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत २ गडी गमावून १७९ धावा केल्या. विराट कोहली ४४ चेंडूत ६२ धावा करून नाबाद राहिला आणि सूर्यकुमार यादव २५ चेंडूत ५१ धावा करून नाबाद राहिला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत ९५ धावांची भागीदारी झाली. डावाच्या उत्तरार्धात भारतीय फलंदाजांनी जरी वेग पकडला असला, तरी ते पॉवर प्लेमधील संथ सुरुवातीवर मात्र काहीतरी इलाज करणे आवश्यक आहे. पहिल्या नऊ षटकांत ५३/१ पर्यंत पोहोचले. १०व्या षटकानंतर रोहितने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली.

नेदरलँड्सविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “पाकिस्ताननंतरच्या त्या मोठ्या विजयानंतर, आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की आमच्याकडे पुढच्या सामन्यासाठी थोडे दिवस होते. त्या सामन्यानंतर लगेचच आम्ही सिडनीला आलो.” नेदरलँड्सचे कौतुक करताना रोहित म्हणाला की, “सुपर-१२ मध्ये ते ज्या प्रकारे पात्र झाले त्याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे.”

कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला की, “आम्ही सुरुवातीला थोडे संथ खेळलो पण विराटने मला फक्त एकच गोष्ट सांगितली की ती म्हणजे, या खेळपट्टीवर थोडा वेळ थांबून खेळपट्टीचा अंदाज घ्यायचा आणि नंतर मग मोठे फटके खेळायचे आहेत. मी माझ्या अर्धशतकावर नाखुश आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटी धावा धावफलकावर लागण्यास सुरुवात झाली.” रोहितने ३५ चेंडूत अर्धशतकाचा टप्पा गाठला असला तरी त्याच्या धावसंख्येच्या वेगावर तो खूश नव्हता.