इंग्लंडमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकातील दोन सामन्यांमध्ये मला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. मी फार निराश झाले होते. त्या वेळी मी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना संघात स्थान देऊ नका, अशी विनंती केली होती, पण प्रशिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला पाठिंबा दिला आणि त्यामुळेच मला विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत खेळता आले, असे भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने सांगितले.
‘विश्वचषकाच्या सुरुवातीलाच मी निराश झाले होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, जर माझ्याकडून चांगली कामगिरी होत नसेल तर दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात यावी. कारण अनुभव गाठीशी असला तरी संघात जागा अडवण्यात मला काहीही रस नव्हता. संघाच्या भल्याचा विचार करून मी प्रशिक्षकांना मला न खेळवण्याबद्दल सांगितले होते, पण त्यांना माझ्या गुणवत्तेवर विश्वास होता. त्यांनी मला समजावले. पाठिंबा दिला. तूच भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य करणार, असा आत्मविश्वास दिला. त्यानंतर माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. या साऱ्याचे श्रेय प्रशिक्षक आणि कर्णधार मिताली राज यांना द्यायला हवे,’ असे झुलन म्हणाली.