World Cup 2019 IND vs NZ : ICC च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना ठरला. या १-१ गुणामुळे न्यूझीलंड ४ सामन्यांत ७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर भारतीय संघ ३ सामन्यांत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसामुळे सातत्याने रद्द होणाऱ्या सामन्यांवर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बरोबरच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही विश्वचषक स्पर्धेतील पावसावरून एक गमतीशीर ट्विट केले. भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात पावसाची अधिक गरज आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा २०१९ ही भारतात आणा, असे गमतीशीर ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. एका ट्विटर युझरच्या ट्विटवर त्यांनी हा गमतीशीर रिप्लाय दिला आहे.

भारत – न्यूझीलंड सामना हा नॉटिंगहॅमच्या मैदानावर होणार होता. त्या भागात सामन्याच्या आधीच्या दिवसापासूनच पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. अपेक्षेप्रमाणे नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणी आणि पावसाचा अंदाज घेण्यात आला. पण अखेर पावसाचाच जय झाला आणि सामना रद्द करावा लागला.

पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीचा भारतीय संघाला या सामन्यात फटका बसण्याची शक्यता होती. शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. भारताचा पुढील सामना १६ जूनला पाकिस्तानशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc world cup 2019 team india big b amitabh bachchan tweet wc india rain vjb
First published on: 14-06-2019 at 14:57 IST