Delhi Capitals Owner Parth Jindal Reaction on Sanju Samson Wicket: राजस्थान रॉयल्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एकेकाळी सामना राजस्थानच्या ताब्यात असल्याचे दिसत होते. संजू सॅमसनच्या संघाला शेवटच्या ३० चेंडूत ६३ धावा करायच्या होत्या. दिल्लीचे गोलंदाजही धावा देत असल्याने दडपणाखाली होते. येथूनही राजस्थान संघाला २० चेंडूत ५ गडी गमावून केवळ ४१ धावा करता आल्या. संजू सॅमसनची विकेट या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली, ज्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. दिल्ली संघाचे मालकही संजू च्या विकेटवर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आहेत.

संजू सॅमसन या सामन्यात मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पण राजस्थानचे चाहते आणि राजस्थान संघाचंही असं मत होतं की संजू सॅमसन बाद नव्हता. १६ल्या षटकात संजूने षटकारासाठी खेळलेला फटका सीमीरेषेजवळ शाई होपने टिपला, पण त्याचा पाय सीमारेषेला लागल्याचे दिसत होते आणि ज्यामुळे संजू नाबाद होता, अशी चर्चा होती. यावरून तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर संजू पंचांशी यावर बोलताना दिसला, संजूने रिव्हयू घेण्याचाही प्रयत्न केला, पण तिसऱ्या पंचांनीच आधी बाद अश्लायाच निर्णय दिल्याने ते शक्य नव्हते. संजू मैदानाबाहेर जायला तयार नव्हता, पण अखेरीस बाद घोषित केल्याने तो मैदानाबाहेर गेला. त्यादरम्यान दिल्ली संघाचे मालक पार्थ जिंदाल हे स्टॅन्ड्समधून आऊट आहे, आऊट आहे असं आकांताने ओरडताना दिसले, ज्यामुळे सध्या सोशल मीडियावर ते ट्रोल होताना दिसत आहेत. यावर सामन्यानंतर बोलताना संजू नेमकं काय म्हणाला पाहूया

दिल्लीविरूद्धच्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?

संजू सॅमसन पराभवानंतर म्हणाला, मला वाटतं सामना आपल्या हातात होता, १०-११ च्या सरासरीने धावा करायच्या होत्या जे शक्य होतं, पण आयपीएलमध्ये अशा गोष्टी घडत असतात. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर संजू म्हणाला, आम्ही दोन्ही विभांगामध्ये चांगली कामगिरी केली. या परिस्थितीत(अशा खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी) काय करता येईल, यावर आम्हाला काय करायचं होतं. लक्ष्य हे १० धावांनी अधिक होते, आम्ही डेथ ओव्हर्समध्ये काही चौकार-षटकार अडवायला असत्या तर हे लक्ष्य आम्ही सहज गाठू शकतो. दिल्लीने चांगली फलंदाजी केली. जेक फ्रेझरने सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली, पण आम्ही चांगलं पुनरागमन केलं.

सलग दुसऱ्या पराभवानंतरही संजू सॅमसनने आपल्या संघाचे कौतुक केले. संजू म्हणाला- आम्ही तीन सामने गमावले आहेत पण त्या सर्व सामन्यांवर नजर टाकली तर ते खूप अटीतटीचे झाले. आम्ही चांगले खेळत आहोत, आम्हाला चांगली कामगिरी करून पुनरागमन करावे लागेल. आम्ही सामने गमावले आहेत आणि आम्ही कुठे कमी पडलो हे पाहण्याची गरज आहे आणि पुढे जाणंही तितकंच आवश्यक आहे.

जेक फ्रेझर मॅकगर्कने सुरुवातीला दिल्लीसाठी तुफानी फलंदाजी केली तर ट्रिस्टन स्टब्सने संघाला अखेरच्या षटकांमध्ये महत्त्वाच्या धावा मिळवून दिल्या. त्याचे कौतुक करताना संजू म्हणाला, गेल्या १०-११ सामन्यांत चांगली गोलंदाजी करणाऱ्या संदीपविरुद्ध शानदार फलंदाजी करणाऱ्या स्टब्ससारख्या खेळाडूला याचे श्रेय दिले पाहिजे. त्याने आमचे सर्वोत्तम गोलंदाज चहल आणि संदीपविरुद्ध २-३ अतिरिक्त षटकार ठोकले.