India vs Australia 4th T20 Match Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना भारताने २० धावांनी जिंकला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अजेय आघाडी घेतली आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ १५४ धावांवर गारद झाला आणि सामन्यासह मालिकाही गमावली.

भारताने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३ डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ ७ गडी गमावून केवळ १५४ धावा करू शकला आणि २० धावांनी सामना गमावला.

भारताकडून रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ३७ आणि जितेश शर्माने ३५ धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड ३२ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियातर्फे बेन डॉरिसने तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला एक विकेट मिळाली. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ १३ धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या २०० धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.

हेही वाचा – IPL 2024 : “माझी निवड होईल की नाही याची…”; आयपीएलच्या लिलावाबद्दल रचिन रवींद्रचे मोठे विधान

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने ३१ आणि मॅथ्यू शॉर्टने २२ धावांचे योगदान दिले. बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिडने प्रत्येकी १९ धावांचे योगदान दिले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. अक्षर पटेलने तीन आणि दीपक चहरने दोन गडी बाद केले. रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी अतिशय संयमी गोलंदाजी केली आणि अक्षर-रवीने मिळून आठ षटकांत ३३ धावा देत चार बळी घेतले.